Join us  

आता चेन्नई सुपर किंग्सवर पुन्हा येऊ शकते बंदी; कारण जाणून घ्या...

आता मनी लाँड्रींगप्रकरणी अंमलबजावणी संचनालय (ईडी) चेन्नईला नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. जर या प्रकरणी चौकशी झाल्यावर चेन्नईचा संघ यामध्ये दोषी आढळला तर त्यांच्यावर पुन्हा एकदा गदा येऊ शकते. यापूर्वी 2016 आणि 2017 या दोन वर्षांची बंदी चेन्नईवर घालण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 10:47 PM

Open in App

मुंबई : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा पाय खोलात जाऊ शकतो. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नईच्या संघावर दोन वर्षे बंदी घातली होती. पण आता मनी लाँड्रींगप्रकरणी अंमलबजावणी संचनालय (ईडी) चेन्नईला नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. जर या प्रकरणी चौकशी झाल्यावर चेन्नईचा संघ यामध्ये दोषी आढळला तर त्यांच्यावर पुन्हा एकदा गदा येऊ शकते. यापूर्वी 2016 आणि 2017 या दोन वर्षांची बंदी चेन्नईवर घालण्यात आली होती.

चेन्नईचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथला सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आली होती. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाच्या वेळी राजस्थान रॉयल्सबरोबर चेन्नईच्या संघावरही बंदी घालण्यात आली होती. 

चेन्नईच्या संघामध्ये इंफ्रास्ट्रक्चर लीझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस 300 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. 2018 साली या कंपनीने चेन्नईच्या संघात गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकीमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध ईडी घेत आहे. 2018 साली चेन्नईच्या संघाने दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते. बंदी घातल्यामुळे चेन्नईला आयपीएलमध्ये 2016 आणि 2017 साली खेळता आले नव्हते. याप्रकरणी चेन्नईच्या संघ मालकांशी या 300 कोटींच्या व्यवहारांबाबत चौकशी करण्यात येऊ शकते. ईडीने आतापर्यंत चेन्नईच्या संघाला कोणतीही नोटीस पाठवलेली नाही. पण याप्रकरणाचा योग्य तो तपास केल्यानंतर त्यांना या 300 कोटी रुपयांच्या व्यवहारात काही भ्रष्टाचार आढळला तर चेन्नईच्या संघ मालकांची ईडी चौकशी करू शकते.

ईडी लीझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या कर्जांबाबत तपास करत होती. हा तपास करत असताना ईडीला लीझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसने 300 कोटी रुपयांची गुंतवणूक चेन्नईच्या संघात केली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या गुंतवणुकीचा तपास ईडी करणार आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये आमच्या खेळाडूंची काय चूक होती? - महेंद्रसिंग धोनी ‘आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील २०१३ साली झालेली स्पॉट फिक्सिंगची घटना माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना होती. यामुळे मी पहिल्यांदाच अत्यंत निराश झालो होतो,’ असे सांगत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पहिल्यांदाच या फिक्सिंग प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, ‘या प्रकरणात खेळाडूंची काय चूक होती?’ असा प्रतिप्रश्नही धोनीने केला.

गेल्या सहा वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना या प्रकरणावर धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. कारण यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या संघावर दोन वर्षांची बंदी लागलीच, शिवाय फिक्सिंग प्रकरणामध्ये धोनीवरही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामुळेच आपण आयुष्यात पहिल्यांदाच निराशेच्या गर्तेत अडकलो होतो, असे धोनीने स्पष्ट केले.

गेल्या वर्षी शानदार पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने थेट जेतेपदावर कब्जा करत आपला हिसका दाखवून दिला. या धमाकेदार पुनरागमनावर आधारित असलेल्या ‘रोर आॅफ दी लायन’ या वेब सीरिजमध्ये धोनीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये धोनीने म्हटले आहे की, ‘या प्रकरणाआधी मी कधीच इतका निराश झालो नव्हतो. या घटनेनंतर माझ्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आणि दोन वर्षे आमचा संघ आयपीएल खेळू शकला नाही. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात खराब वेळ होती. २००७ साली भारतीय संघ खराब प्रदर्शनामुळे हरला होता, पण २०१३चे स्पॉट फिक्सिंग प्रकरण पूर्णपणे वेगळे होते.’

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सअंमलबजावणी संचालनालय