Join us  

क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही भारताने पाकिस्तानशी खेळू नये; नेटकऱ्यांची तीव्र भावना

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात (Pulawama Terror Attack) भारताचे 38 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 3:33 PM

Open in App

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात (Pulawama Terror Attack) भारताचे 38 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. पाकिस्तानला जशासतसे उत्तर द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. क्रिकेटपटूंसह भारताच्या अन्य खेळाडूंनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधही पूर्णपणे तोडून टाकावे अशी मागणी होत आहे. पाकिस्तानशी असलेले राजकीय संबंध पाहता दोन्ही देशांत क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीच, परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. पण, आता पाकिस्तान संघाविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळण्याची आवश्यकता नाही, अशा तीव्र भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००७ सालापासून एकही मालिका खेळवण्यात आलेली नाही. यापूर्वी बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये मालिका खेळवण्याचा करार झाला होता. पण भारतामध्ये झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरून बीसीसीआयने पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला होता. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानबरोबर खेळण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच पाकिस्तानबरोबर क्रिकेट मालिका खेळणार असल्याचा पवित्रा बीसीसीआयने घेतला होता.  गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला.  या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामन्यांवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत 16 जूनला मँचेस्टर येथील ओल्ड ट्रेफर्ड येथे भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताने हा सामना न खेळून दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमच पाकिस्तानला भरावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :बीसीसीआयआयसीसीआयसीसी विश्वकप २०१९पुलवामा दहशतवादी हल्लापाकिस्तान