टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान येत्या रविवारी (१५ फेब्रुवारी) रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने भारताविरुद्धच्या सामन्यासाठी आपला 'गेम प्लॅन' जाहीर करत टीम इंडियाला थेट आव्हान दिले आहे.
अमेरिकेविरुद्धच्या विजयानंतर साहिबजादा फरहानने भारताविरुद्धच्या रणनीतीवर भाष्य केले. तो म्हणाला की, "आमचा संघ भारताविरुद्ध पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेईल. आम्ही आशिया कपमधील आमच्या यशस्वी गेम प्लॅनचे पालन करू. आमचा प्रयत्न सकारात्मक राहून आक्रमक क्रिकेट खेळण्याचा असेल."
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात फरहान चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने अवघ्या ४१ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यामध्ये १७८.०५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने ५ षटकार आणि ६ चौकार ठोकले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
साहिबजादा फरहानची कामगिरी
साहिबजादा फरहानने टीम इंडियाला आक्रमक क्रिकेट खेळण्याची धमकी दिली असली, तरी त्याची कारकीर्द काही वेगळेच सांगते. फरहानचा टी-२० कारकिर्दीतील एकूण स्ट्राईक रेट केवळ १३२.२३ आहे. टी-२० क्रिकेट आणि भारताच्या तगड्या गोलंदाजीसमोर हा स्ट्राईक रेट फारसा प्रभावी मानला जात नाही.
चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता
पाकिस्तानने अमेरिकेवर ३२ धावांनी विजय मिळवून आपला आत्मविश्वास उंचावला असला, तरी भारताचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. कोलंबोमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी तिकिटांची आधीच हाणामारी सुरू झाली असून क्रिकेट विश्वाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.