बेंगळुरू - श्रेयस अय्यर व सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर मुंबईने रविवारी येथे विजय हजारे वन-डे स्पर्धेत रेल्वेविरुद्ध ५० षटकांत ४०० धावांची दमदार मजल मारल्यानंतर १७३ धावांनी शानदार विजय नोंदवला.
‘अ’ गटातील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने रेल्वेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. श्रेयस अय्यरने ११८ चेंडूंना सामोरे जाताना १४४ आणि शॉने ८१ चेंडूंमध्ये १२९ धावांची खेळी केली. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वेगाने धावा फटकाविण्याच्या प्रयत्नात रेल्वेचा डाव ४२.४ षटकांत २२७ धावांत संपुष्टात आला. मुंबईतर्फे शम्स मुलानीने २६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. मुंबई संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. स्थानिक वन-डे स्पर्धेत ४०० धावांचा आकडा गाठणारा मुंबई केवळ दुसरा संघ आहे. यापूर्वी २०१० मध्ये मध्य प्रदेशने रेल्वेविरुद्ध ६ बाद ४१२ धावा केल्या होत्या. (वृत्तसंस्था)