पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ मधील क्वालिफायर २ सामना रंगला. या सामन्यात पंजाबच्या संघाने मुंबईचा पाच विकेट्सने पराभव करून तब्बल ११ वर्षानंतर अंतिम फेरी गाठली. मुंबईच्या संघाच्या मालकीण नीता अंबानी पंजाब किंग्जकडून मिळालेला हा पराभव पचवू शकल्या नाहीत. पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर नीता अंबानी यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
पंजाबविरुद्धचा पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या निराश झाला. त्याच्या व्यतिरिक्त हा सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईची मालकीण नीता अंबानी देखील इमोशनल झाल्या. या पराभवानंतर नीता अंबानी डोके धरून बसल्या.
पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या निराश झाला आणि मैदानातच बसला. मार्कस स्टोइनिसने त्याला सहानुभूती दाखवली. त्यानंतर जसप्रीत बुमराह त्याच्याकडे जातो आणि त्याला उभे करून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. संघाचा युवा वेगवान गोलंदाज अश्विनी कुमारही सामन्यानंतर भावूक झाला. त्यालाही बुमराहने समजावले. या सामन्यात अश्विनीने चांगली गोलंदाजी केली. परंतु, त्याच्या अखेरच्या षटकात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला चार षटकार ठोकून एक षटक आधीच सामना जिंकला. या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या.
मुंबईचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगलेया पराभवानंतर मुंबईचे सहाव्यांदा आयपीएल जेतेपद जिंकण्याचे स्वप्नही भंगले. याशिवाय, आयपीएलमध्ये २०० धावा केल्यानंतरही मुंबईने सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.