बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या तदर्थ समितीने देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मानधनाबाबत एक क्रांतीकारी पाऊल उचलले. समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू तमीम इक्बाल यांच्या पुढाकाराने, महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांतील खेळाडूंच्या वेतन आणि सामना शुल्कात लक्षणीय वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तमीम इक्बाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिला क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीबाबत धक्कादायक वास्तव समोर आले. एका महिला खेळाडूला एका एकदिवसीय सामन्यासाठी अवघे १००० टाका (७५० रुपये) मिळत असल्याचे समजताच तमीम यांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले.
ही बाब उघडकीस आल्यानंतर, बोर्डाने महिला क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ करण्यात आली. त्यांना आता एका एकदिवसीय सामन्यासाठी १५ हजार टाका, प्रथम-श्रेणी सामन्यासाठी २० हजार टाका आणि टी२० सामन्यांसाठी १० हजार टाका मिळतील. शिवाय, देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अव्वल ३६ महिला खेळाडूंचे मासिक वेतन ३० हजार टाकांवरून ४० हजार टाकांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
पुरूष क्रिकेटपटूंच्या वेतनातही वाढ
याशिवाय, गेल्या ३-४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुरुष खेळाडूंच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. पुरुषांच्या प्रथम-श्रेणी सामन्याचे शुल्क ७० हजारावरून १ लाख टाका इतके वाढवण्यात आले आहे. या निर्णयावर बोलताना तमीम इक्बाल म्हणाले की, "हे वेतन जास्त नाही, पण एका मोठ्या बदलाची ही सुरुवात आहे. खेळाडूंच्या मेहनतीवरच क्रिकेटचा विकास अवलंबून असतो, त्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा हक्क आहे."
बोर्डाची प्रतिमा सुधारण्यावर भर
वेतनवाढीसोबतच तमीम यांनी बीसीबीच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या दीड वर्षात मंडळाच्या प्रतिमेला बसलेला तडा सुधारणे हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रिकेट हा राष्ट्रीय अभिमानाचा विषय असून, बोर्डाशी संबंधित प्रत्येकाने त्या अभिमानाने काम केले पाहिजे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे बांगलादेशच्या तळागाळातील खेळाडूंना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, आगामी काळात बोर्डात आणखी काही महत्त्वाच्या सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे.