वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला साजेशी कामगिरी करता आली नाही.. ९ पैकी चार सामने त्यांना जिंकता आणि साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पाकिस्तानच्या कामगिरीवर चाहते, माजी खेळाडू आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाकडून चौफेर टीका झाली. बाबर आजमने ( Babar Azam) या अपयशाची जबाबदारी स्वीकारली आणि संघाच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
बाबर आजमने कॅप्टन्सी सोडण्याचा दुपारी निर्णय जाहीर केला आणि सायंकाळपर्यंत शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० व वन डे संघाचा नवा कर्णधार बनला. शान मसूदकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. शाहीनच्या निवडीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी चर्चेत आला, कारण शाहीन हा त्याचा जावई आहे आणि त्याच्यासाठी लॉबिंग केल्याचा शाहिदवर आरोप केला गेला.
या आरोपांवर शाहिद आफ्रिदीने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, "एवढ्या लवकर कर्णधार बदलण्याची गरज नाही, मी हेच सांगत होतो. पंतप्रधानांसोबत मी क्रिकेट व कर्णधारपदाबाबत चर्चा केली. मी तेव्हा माझं मत मांडलं की, बाबर आजमला कर्णधारपदावरून हटवण्याची गरज नाही. त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहायला हवं. जर तुम्हाला मर्यादित षटकांच्या संघासाठी नवा कर्णधार करायचाच असेल तर मोहम्मद रिझवान हा योग्य उमेदवार आहे. मी हे यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे.''
''मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअऱमनसोबतही चर्चा केली. कसोटी संघाच्या कर्णधारपदावर बाबरने कायम राहायला हवे, असे मी सांगितले. वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी मोहम्मद रिझवानचं नाव मी सुचवलं होतं. तो मुलतान सुलतान्सचा कर्णधार होता. संघाला पुढे कसं घेऊन जायचं हे त्याला माहित्येय. शाहीनला कर्णधार करण्याचा निर्णय हा मोहम्मद हाफिज व चेअरमन यांचा आहे,''असेही शाहिद आफ्रिदीने स्पष्ट केले.
शाहिनला कर्णधार बनवण्यात माझी कोणतीच भूमिका नाही. मी त्या विरोधात आहे. मला या प्रकरणात पडायचे नव्हतेच, कारण लोकांना असं वाटतंय की मी शाहीनसाठी लॉबिंग केलं. तो माझा जावई असल्याने हा आऱोप होतोय, परंतु या निर्णयाशी माझा काहीच संबंध नाही, असेही तो म्हणाला.