नवी दिल्ली : पराभव न स्वीकारण्याची वृत्ती आणि आत्मविश्वास बघता सध्याचा कर्णधार विराट कोहलीची तुलना महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासोबत करता येईल, असे मत भारताचे माजी सलामीवीर फलंदाज कृष्णमाचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले.
श्रीकांत कपिल यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते, तर कोहली २०११ मध्ये विश्वविजेतेपद पटकावणाºया संघाचा खेळाडू होता. श्रीकांत म्हणाले, ‘मी कपिल देव यांच्यासोबत खेळलो आहे आणि विराट कोहलीची निवड करणाºया निवड समितीचा अध्यक्ष राहिलेलो आहे. या दोघांचे वर्तन सारखे आहे, असे मी सांगू शकतो. दोघांमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. ते केवळ विजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरतात. पराभव न स्वीकारण्याची वृत्ती आणि आक्रमकता यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा खेळ शानदार होतो. सकारात्मकतेचा विचार केला तर दोघेही सारखे आहेत.’ याच कार्यक्रमात बोलताना व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, ‘मला विराट कोहलीची प्रतिबद्धता आवडते. त्याची प्रतिबद्धता कमी होईल, अशी मला भीती होती. पण एक सत्र तर सोडाच पण एका षटकासाठीही त्याच्यातील ऊर्जा कमी होत नाही, हे खरेच प्रशंसनीय आहे.’ कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारात ५० पेक्षा अधिक सरासरीने धावा फटकावल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने ५३.६२ सरासरीने ७,२४० आणि वन-डेमध्ये जवळजवळ ६० च्या सरासरीने ११,८६७ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)