KL Rahul Ranji Comeback : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर आता टीम इंडियाचे बडे खेळाडू देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा यांनी आपले रणजी कमबॅक केले. त्यात शुबमन गिल आणि रवींद्र जाडेजा वगळता इतरांना फारशी छाप पाडता आली नाही. आता हरवलेला फॉर्म शोधण्यासाठी विराट कोहली आणि केएल राहुल देखील रणजीच्या मैदानात उतरले आहेत. विराटच्या संघाची प्रथम गोलंदाजी असल्याने त्याच्या फलंदाजीबाबत आज बोलता येऊ शकत नाही. परंतु केएल राहुल मात्र आपल्या रणजी कमबॅकमध्ये फ्लॉप ठरला.
केएल राहुलने किती धावा केल्या?
रणजी ट्रॉफीच्या कमबॅक सामन्यात राहुल ५ वर्षांनंतर खेळपट्टीवर परतला. मात्र त्याला दमदार पुनरागमन करता आले नाही. आजपासून सुरू झालेल्या हरयाणा विरुद्धच्या सामन्यात कर्नाटक संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. ४५ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर केएल राहुल फलंदाजीला आला. २०२० नंतर राहुलची रणजी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ. राहुलने मयंक सोबत ५३ धावांची भागीदारी केली पण राहुलला स्वत:साठी फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. केएल राहुलने ३७ चेंडू खेळले. त्यापैकी २४ चेंडूंवर एकही धाव निघाली नाही. अखेर ४ चौकारांसह एकूण २६ धावांची खेळी करून तो माघारी परतला.
कर्नाटकच्या संघातून खेळताना राहुल चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना कर्नाटक संघाचा कर्णधार आणि राहुलचा चांगला मित्र मयंक अग्रवाल नॉन स्ट्राईकवर होता. त्यामुळे दोन मित्रांची मोठी भागीदारी पाहायला मिळेल अशी कर्नाटकच्या चाहत्यांची अपेक्षा होती. पण केएल राहुल २६ धावांवर बाद झाला. असे असले तरी त्याच्याकडे या सामन्यात अजून एक डावात धावा करण्याची संधी आहे. त्या संधीचा तो कसा वापर करतो ते पाहण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात गिल पहिल्या डावात फ्लॉप ठरला होता, पण दुसऱ्या डावात त्याने शतक ठोकले होते. तशी काही किमया राहुल साधणार का, याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.