Join us  

किवी संयुक्त विश्वविजयी हवे होते - गौतम गंभीर

अंतिम सामन्यात इंग्लंडने एकूण २६, तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. या नियमावर अनेकांनी टीकाही केली. याविषयी आता गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:57 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाच्या खेळामध्ये सर्वाधिक सातत्य होते. त्यामुळेच यजमान इंग्लंडसह स्पर्धेत संयुक्त विजेते म्हणून त्यांचा हक्क होता,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले.अंतिम सामन्यात इंग्लंडने एकूण २६, तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. या नियमावर अनेकांनी टीकाही केली. याविषयी आता गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे. एका आघाडीच्या क्रीडा वाहिनीच्या आॅनलाईन ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमामध्ये गंभीरने म्हटले की, ‘गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला संयुक्त विजेतेपद मिळायला पाहिजे होते. न्यूझीलंडला जागतिक विजेतेपदाचे पदक मिळायला हवे होते, पण दुर्दैवाने असे झाले नाही. ’गंभीरने पुढे म्हटले की, ‘जर स्पर्धेतील न्यूझीलंडच्या एकूण कामगिरीकडे पाहिले, तर त्यांच्या खेळामध्ये सर्वाधिक सातत्य दिसून येईल. मागील दोन विश्वचषकांमध्ये ते उपविजेते राहिले असून, त्यांच्या प्रदर्शनामध्ये कमालीचे सातत्य राहिले आहे. माझ्या मते ते अत्यंत आव्हानात्मक आणि स्पर्धात्मक सामने खेळले. आपण त्यांना पुरेसे श्रेय देऊ शकलो नाही.’ (वृत्तसंस्था)लॉर्डस मैदानावर झालेल्या या विश्वचषक अंतिमसामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याच्या नियमाच्या जोरावर यजमान इंग्लंडने बरोबरी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला नमवत विश्वविजेतेपद पटकावले होते. निर्धारित षटकांमध्ये बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या नियमानुसार इंग्लंडचा संघ विश्वविजयी ठरला होता. 

टॅग्स :गौतम गंभीरआंतरराष्ट्रीय क्रिकेटवर्ल्ड कप 2019