Join us  

कपिल देव यांनी तयार केला रवी शास्त्री-विराट कोहलीचा रिपोर्ट कार्ड; एका गोष्टीसाठी कापले १० मार्क

रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 6:48 PM

Open in App

Kapil Dev presented the report card of Virat Kohli-Ravi Shastri era - भारतीय संघाच्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया आजपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या तयारीचा श्रीगणेशा करणार आहे. (  mission of T20 World Cup 2022 begins ). भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी रवी शास्त्रीविराट कोहली या जोडीचा रिपोर्ट कार्ड तयार केला आहे. २०१७पासून रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि विराट हा तीनही फॉरमॅटचा कर्णधार होता. वर्ल्ड कपनंतर विराटनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

यूएईत नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. विराटच्या नेतृत्वाखालील अखेरच्या स्पर्धेत भारतीय संघ जेतेपद पटकावेल, अशी आशा होती. पण, तसे काहीच घडले नाही. रवी शास्त्री यांनीही वर्ल्ड कपनंतर करारात वाढ करण्यास नकार दिला. कपिल देव यांनी शास्त्री-कोहली जोडीचं कौतुक केलं. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,''या दोघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांना मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही, हे मी समजू शकतो, परंतु तुम्ही मागील पाच वर्ष पाहाल, तर भारतीय संघाचे वर्चस्व दिसेल.''

ते पुढे म्हणाले,''आयसीसी चषक या एका गोष्टीची उणीव जाणवेल. पण, ती एक गोष्ट सोडली तर टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड... जगाच्या कानाकोपऱ्यात विजय मिळवला आहे.'' १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेतील कामगिरी ही अत्यंत निराशाजनक असल्याचे मत व्यक्त केले. ''वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करणे, हेही मोठे यश आहे. २००७च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघावर २०२१मध्ये अशी नामुष्की ओढावली. ते जर टॉप फोअरमध्ये गेले असते आणि पराभूत झाले असते, तर समजू शकलो असतो. पण, त्यांना उपांत्य फेरीतही प्रवेश करता आला नाही, मग टीका होणं साहजिक आहे.''

कपिल देव यांनी शास्त्री-कोहली जोडीला १०० पैकी ९० गुण दिले. आयसीसी ट्रॉफी न जिंकल्यामुळे त्यांनी १० गुण कापले. ''किती चषक जिंकले, यावरून तुम्ही मुल्यमापन कराल, तर वेगळं गणित होईल. पण, मागील पाच वर्षांत तुम्ही कोणत्या दर्जाचे क्रिकेट खेळलात त्यावरून मी या जोडीला १०० पैकी ९० गुण देईन. आयसीसी ट्रॉफी नसल्यामुळे मी १० गुण कापतोय,''असे कपिल देव यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :कपिल देवरवी शास्त्रीविराट कोहली
Open in App