मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ कॅरेबियन आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. तेथे संघ दोन कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत कोहली व बुमराह यांना विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत या दोन कसोटींचा समावेश आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संघातील खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत आहे. कोहली आणि बुमराह तीन दिवसांच्या सराव सामन्यापूर्वी ( 17-19 ऑगस्ट) संघात सहभागी होतील. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी या खेळाडूंना A संघासोबत विंडीज दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता भारतीय संघात काही खेळाडूंना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. 8 ते 14 या कालावधीत तीन वन डे सामने होतील.