- एबी डिव्हिलियर्स लिहितात...
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमची गणना विश्व क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मैदानात होते. याच मैदानावर आता आरसीबी संघ यंदा आपल्या पहिल्या गृहमैदानावरील लढतीत गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. आम्ही दडपणाखाली आहोत. कारण केवळ चाहत्यांच्या अपेक्षांचे नाही तर आपल्या सलामी लढतीत चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या कामगिरीचेही ओझे आहे.
या आठवड्यात आमची तयारी पूर्णपणे कडव्या मेहनतीवर आधारित होती. मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आम्ही केवळ फिटनेस व फिटनेसवरच लक्ष दिले. त्यानंतर आम्ही थोडा वेळ आपल्या क्रिकेट कौशल्याचा सराव केला. मला ही पद्धत आवडली. संघ तयार करण्याची ही जुनी पद्धत आहे. त्यात लक्ष केवळ कडव्या मेहनतीवरच नव्हे, तर एकत्रितपणे कठोर मेहनत घेण्यावर केंद्रित झालेले असते. एकत्र घाम गाळणे आणि एकच लक्ष्य मिळवण्याचा प्रयत्न शानदार असतो. जर कुणी विचार करीत असेल की यंदाच्या मोसमात आयपीएल संघात प्रेमाने वाढविलेले खेळाडू असून त्यांना पोटच्या गोळ्याप्रमाणे जपले जाते, पण या आठवड्यातील आमचा सराव बघितल्यानंतर त्यांना आपले मत बदलावे लागेल.
चेन्नईमध्ये आम्ही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाही, पण संघाचे संतुलन योग्य आहे. अंतिम संघात सातत्य असेल तरच संघाला कुठल्या स्पर्धेत लय मिळवता येते. आमच्यात नक्कीच याचीच उणीव आहे. अशा स्थितीत आम्ही मुंबईविरुद्ध विजय मिळवत
आपल्या मोहिमेला योग्य दिशा देऊ शकतो.
यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात झाली. आंद्रे रसेलने १९ चेंडूंमध्ये ४९ धावांची खेळी करीत केकेआरला सनरायजर्सविरुद्ध विजय मिळवून दिला. रसेलच्या कामगिरीमुळे फलंदाजीचे नवे निकष स्थापन झाले. त्याचप्रमाणे रविचंद्रन अश्विनतर्फे जोस बटलरला धावबाद करणे चर्चेचा विषय आहे. मला बटलरसाठी वाईट वाटते. कारण तो धाव घेण्याचा प्रयत्न करीत नव्हता. अश्विननेही काही चुकीचे केले नाही, कारण त्याने नियमाविरुद्ध कुठलीही कृती केली नाही. दरम्यान, याबाबतचा नियम ४१.१६ ला स्पष्ट करण्याची गरज
आहे. (टीसीएम)