दुबई : सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाला रविवारी खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत मनोधैर्य उंचावलेल्या पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई संघाला आत्ममश्गुल राहता येणार नाही. कारण ख्रिस गेलच्या आगमनामुळे पंजाब संघात नवा उत्साह संचारला आहे.
मुंबई संघ एका विजयामुळे प्ले-आॅफच्या समीप जाणार आहे तर आणखी एक पराभव पंजाब संघाला या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरू शकतो. मुंबईचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा (२५१) आणि त्याचा सहकारी क्विंटन डिकॉक (२६९) चांगल्या फॉर्मात आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव (२४३ धावा) आणि ईशान किशन (१८६ धावा) चांगली कामगिरी करीत आहेत. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट सध्या आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी गोलंदाजीची जोडी मानली जात आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता किंग्स इलेव्हन पंजाबचे फलंदाज धावा काढतात त्यावेळी गोलंदाज अपयशी ठरतात.