मुंबई : किंग्ज ईलेव्हन पंजाबने Kings XI Punjab) अखेर सलग पाच पराभव पत्करल्यानंतर स्पर्धेतूल यंदाचा दुसरा विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banlore) संघाला शारजाहच्या मैदानावर ८ गड्यांनी नमविले. पंजाबने शानदार खेळ करत बाजी मारली असली, तरी यासाठी काही प्रमाणात आरसीबीचाही हातभार लागला आहे. कारण, धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स (Ab De Villiers) चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही त्याला सहाव्या स्थानी खेळविण्याची चाल आरसीबीची चुकली आणि येथेच त्यांचा पराभव झाला. आता एबीला इतक्या उशीराने फलंदाजीला का पाठविण्यात आले याचे उत्तरही कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दिले आहे.
पंजाबने याआधीचा विजयही आरसीबीविरुद्धच मिळवला होता. त्यात आरसीबीचा धडाका पाहता यावेळी ते पराभवाचा हिशोब चुकता करतील असे वाटत होते. मात्र पंजाबने बाजी मारत आरसीबीला पुन्हा नमविले. दखल घेण्याची बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच शारजाहच्याच मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एबीने वादळी खेळी केली होती. त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना ३३ चेंडूंत ७३ धावांचा तडाखा देत केकेआरचा पालापाचोळा केलेला. मात्र यानंतरही आरसीबीने एबीला सहाव्या स्थानी पाठविण्याची चूक केली.
क्रिकेटतज्ज्ञांच्या मते, कोहली पंजाबच्या लेगस्पिनर्सकडे पाहून थोडा घाबरला होता. आकडेवारीनुसार २०१८ पासून एबी ८ आणि कोहली ६ वेळा लेगस्पिनरविरुद्ध बाद झाले आहेत. याच चालीमध्ये आरसीबी चुकले, कारण पंजाबने या सामन्यात मुरुगन अश्विन आणि रवी बिश्नोई या दोन लेगस्पिनर्सना खेळविले होते.
सामन्यानंतर विराट कोहलीने संघाच्य योजनेबाबत सांगितले. कोहली म्हणाला की, ‘लेफ्ट हँड-राइट हँड कॉम्बिनेशन लक्षात ठेवूनच हे निर्णय घेण्यात आले होते. आम्हाला बाहेरुन संदेश मिळाला होता की, लेफ्ट हँड-राइट हँड कॉम्बिनेशन कायम राखायचा आहे. त्यांच्याकडे दोन लेगस्पिनर होते. अनेकदा तुमचे निर्णय निकाल बदलू शकत नाही. तरीही आम्ही १७० धावांचा पल्ला पार केला आणि ही चांगली धावसंख्या होती.’