IPL 2026 : आयपीएलच्या आगामी हंगामाआधी गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायझी आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) आयपीएलमधील सामन्यांसाठी RCB च्या संघाला परवानगी मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने गत हंगामात जेतेपद मिळवल्यानंतर बंगळुरुच्या मैदानात विजय आनंद साजरा करताना मोठी दुर्घटना घडली होती. बंगळुरुच्या स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्गटनेत ११ चाहत्यांनी आपला जीव गमावला होता. या दुर्घटनेनंतर एम. चिदम्बरम स्टेडियमवरील क्रिकेटला ब्रेक लागला होता. सुरक्षिततेच्या कारणास्तवर महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील या मैदानातील नियोजित सामनेही दुसऱ्या शहरात स्थलांतरित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB घरच्या मैदानातील पाच सामने बंगळुरुच्या मैदानात खेळणार तर...
विराट कोहलीचा आरसीबीचा संघ आगामी हंगामातील सामने कोणत्या मैदानात खेळणार? यासंदर्भात मोठा पेच निर्माण झाला होता. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आगामी हंगामातील घरच्या मैदानातील पाच सामने बंगळुरुच्या स्टेडियमवर खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय २ सामने रायपूरच्या मैदानात खेळणार असल्याची माहिती फ्रँचायझीनं दिली आहे. आरसीबीने कर्नाटक सरकार, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि कर्नाटक पोलिसांचे आभारही मानले आहेत.
IND vs ENG : हो, संजू चुकला! पण सेमीफायनल आधी बंदीची कारवाई होईल ही अफवाच; कारण...
मुंबई इंडियन्सकडे एनओसीची मागणी
आरसीबीने नवी मुंबईतील डीवाय पाटील (DY Patil Stadium) स्टेडियमवर घरचे सामने खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे एनओसीची मागणी केली होती. मात्र मुंबई इंडियन्सने त्यास मंजुरी दिली नाही. आगामी हंगामात RCB चा संघ आपले सामने कोणत्या मैदानात खेळणार? यासंदर्भातील चर्चा रंगत असताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुण्याच्या मैदानात RCB चा पाहुणचार करण्याची तयारीही दर्शवली होती. पण पुन्हा घरचे दरवाजे खुले झाल्यामुळे RCB ला मोठा दिलासा मिळाला आहे.
स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणा व नूतनीकरणाची कामे
जस्टिस कुन्हा समितीच्या शिफारशींनुसार यावर्षी स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणा व नूतनीकरणाची कामे करण्यात आली आहेत. वंयकटेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील केएससीएने सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत, जेणेकरून बेंगळुरूमध्ये पुन्हा क्रिकेट सामने सुरळीत पार पडतील.