आयपीएलच्या मागील हंगामात कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने अत्यंत निराशाजनक कामगिरी करून दाखवली. त्यानंतर ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवले जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता स्वतः फ्रँचायझी मालक संजीव गोएंका यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी सर्व १० संघांच्या कर्णधारांचे फोटोसेशन पार पडले. यावेळी पंत आनंदी दिसत असला तरी, पडद्यामागे त्याच्या कर्णधारपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. केएल राहुलशी फारकत घेतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने पंतकडे नेतृत्व सोपवले. मात्र, आयपीएलच्या मागच्या हंगामात लखनौच्या संघाने १४ पैकी केवळ सहा सामने जिंकले. तर, ८ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्याच फेरीत संघ बाहेर पडल्याने टीकाकारांनी पंतच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवले जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला.
संजीव गोएंका काय म्हणाले?
संजीव गोएंका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, "ऋषभ पंतच्या कर्णधारपदाबद्दलच्या चर्चा वाचून मला हसू आले. आम्ही एकत्र बराच वेळ घालवला आहे, मला त्याचा स्वभाव आणि खेळाप्रती असलेले समर्पण चांगले माहीत आहे. कॅप्टन, हा हंगाम तुझ्यासाठी खूप चांगला जावो, अशा शुभेच्छा दिल्या." त्यामुळे पंतच संघाचे नेतृत्व करणार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
एलएसजी समोर विजेतेपदाचे आव्हान
२०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला अद्याप एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. पंतसाठी हा कर्णधार म्हणून दुसरा हंगाम असून, त्याच्या कामगिरीवर व्यवस्थापनाचे आणि चाहत्यांचे बारीक लक्ष असेल.