Why GT Captain Shubman Gill Not Playing vs RR Today : IPL च्या १९ व्या हंगामातील पहिल्या डबल हेडर सामन्यात कॅप्टन्सी बदलाचे डबल ट्विस्ट पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ हार्दिक पांड्याशिवाय दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात मैदानात उतरला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातून गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने माघार घेतली. हार्दिक पांड्या आजारी असल्यामुळे सामन्याला मुकला असताना शुभमन गिलने दुखापतीमुळे माघार घेतल्याचे समोर आले आहे. तो लवकरच पुनरागमन करेल, असा संघ व्यवस्थापनाला विश्वास आहे. पण तो नक्की कधी परतणार हे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे हा गुजरात टायटन्सच्या संघाला मोठा धक्का मानला जात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुभमन गिलला काय झालं?
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलच्या जागी गुजरात टायटन्सच्या संघाचे नेतृत्व राशीद खान याच्याकडे सोपवण्यात आले. नाणेफेकीनंतर त्याने नियमित कर्णधार शुभमन गिलच्या अनुपस्थितीमागचं कारण सांगितले. तो म्हणाला की, गिल हा स्नायू दुखापतीच्या समस्येने त्रस्त असून तो लवकर संघात कमबॅक करेल. त्याच्या जागी कुमार कुशाग्र याला गुजरातच्या संघात संधी देण्यात आली आहे.
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
लकी मैदानात शुभमन गिलवर आली माघार घेण्याची वेळ
गुजरात टायटन्सच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पंजाब किंग्सच्या संघाने ३ विकेट्सने त्यांना पराभूत केले होते. पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचे आव्हान असताना गुजरात टायटन्सला कॅप्टनच्या दुखापतीमुळे दुसरा मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलची कामगिरीही उजवी राहिली आहे. जगातील सर्वात मोठ्या मैदानात त्याने IPL मध्ये ६० च्या सरासरीसह १५९ च्या स्ट्राइक रेटनं हजारहून अधिक धावा केल्या आहेत. पण लकी मैदानात राजस्थान विरुद्धच्या सामन्यात कॅप्टनवर माघार घेण्याची वेळ आली आहे.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात सेट झाल्यावर फसला होता गिल
शुभमन गिल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे आणि कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. पण टी-२० क्रिकेटमध्ये तो आपल्या फलंदाजीतील धमक दाखवण्यात अपयशी ठरला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघातून डच्चू देण्यात आल्यावर IPL मध्ये छोट्या फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान निर्माण झाले असताना आता दुखापतीचे ग्रहण त्याच्यासह GT साठी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गिलनं २७ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या होत्या. ही संघाकडून सर्वोच्च कामगिरीही ठरली. पण चांगली सुरुवात करून मोठी खेळी करण्यात तो कमी पडला अन् संघाला पराभवाचा सामना करावा लागला.