Ajinkya Rahane Says Bowling First Costly After KKR's Loss vs SRH : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सहावा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आला. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा यशस्वी बचाव करत सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ६५ धावांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चुकाचा होता, असे सांगत सनरायझर्स गोलंदाजांनी आम्हाला हळू चेंडू टाकून फसवलं, अशा आशयाचे वक्तव्य अजिंक्य रहाणेनं केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पराभवानंतर काय म्हणाला अजिंक्य रहाणे?
सलग दुसऱ्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे याने खेळपट्टीचा अंदाज चुकला, असे म्हटले आहे. तो म्हणाला की, "मला वाटते की, आम्हाला दोन मोठ्या भागीदारींची गरज होती. जे फलंदाज सेट झाले होते, त्यांनी खेळ पुढे न्यायचा होता. गोलंदाजी वेळी आम्ही खूप चांगले पुनरागमन केले. पण फलंदाजीमध्ये जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्हाला भागीदारीची गरज असते. आम्हाला ते जमलं नाही. दुसऱ्या डावात चेंडू थोडा थांबून येत होता. पहिल्या डावापेक्षा स्लोअर बॉलची पकड अधिक मजबूत झाली होती. आम्हाला वाटले होते की, खेळपट्टी अधिक चांगली खेळेल. पण ती आणखी संथ झाली." असे सांगत खेळपट्टीचा अंदाज चुकला असे वक्तव्य रहाणेनं केलं. मी पराभवाची कारण देत नाही. SRH च्या संघातील गोलंदाजांनीही स्लोअर चेंडूचा उत्तम वापर केला, असा उल्लेखही त्याने केला.
या पराभवाचा अधिक विचार न करता कमबॅकवर भर देऊ
रहाणे पुढे म्हणाला की, घरच्या मैदानावर सामने जिंकणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल. संघाला अतिरिक्त फलंदाजासह मैदानात उतरण्यासाठी नवी रणनिती आखावी लागेल. आम्ही या पराभवाचा अधिक विचार न करता हा आमच्यासाठी एक वाईट दिवस होता म्हणून दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहू.