Ajinkya Rahane Captaincy IPL 2026: आयपीएलचा आगामी हंगाम काही दिवसांत सुरू होणार आहे. १० संघांमध्ये जेतेपदाच्या ट्रॉफीसाठीची लढाई दोन महिने सुरू राहणार आहे. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी, प्रत्येक संघाने काही बदल केले आहेत. काहींनी संघात तर काहींनी सपोर्ट स्टाफमध्ये बदल केले आहेत. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला ट्रेड केल्यानंतर त्यांचा कर्णधार बदलला आहे. आता कोलकाता नाइट रायडर्सदेखील कर्णधार बदलण्याच्या मार्गावर आहे की काय, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याचे कारण आहे एक सोशल मीडिया पोस्ट. अजिंक्य रहाणे आपले कर्णधारपद सोडणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही बाबी लिहिलेल्या आहेत.
अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा दिला?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे याच्या नावाने एक स्क्रीनशॉट पोस्ट व्हायरल झाली आहे. दुसऱ्या एका युजरने ती पोस्ट आपल्या एक्स पोस्टवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिल्याचे दिसते की, कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणे आणि सामने जिंकणे हा सन्मान आहे. देशांतर्गत क्रिकेटचा नवीन हंगाम जवळ सुरु होणार असतानाच, मला असे वाटते की आता नवीन कर्णधार तयार करण्याची आणि त्याला मोठं करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणूनच मी कर्णधारपद न सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे." त्याच्या या पोस्टवर १२ मार्च २०२६ची तारीख लिहिलेली आहे. त्यामुळे अजिंक्य आणि केकेआरच्या चाहत्यांमध्ये या पोस्टची चर्चा रंगली आहे.
व्हायरल पोस्टमागील सत्य काय आहे?
केकेआरच्या कर्णधारपदाबाबत खरोखरच बदल होणार आहे का? अजिंक्य रहाणेचे हे विधान खरे आहे का? असा तपास केल्यावर लक्षात आले की, अजिंक्य रहाणे किंवा केकेआरने अशी पोस्ट कुठेही केलेली नाही. याचाच अर्थ असा की रहाणेने कर्णधारपदाचा अधिकृत राजीनामा अद्याप तरी दिलेला नाही. आणखी एक बाब अशी दिसून आली की, गेल्या वर्षी मुंबई रणजी संघाचे कर्णधारपद सोडताना अजिंक्य रहाणेने असेच शब्द वापरले होते. त्यामुळे आता व्हायरल होत असलेली पोस्ट बनावट असू शकते, असे म्हटले जात आहे.