रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदाबाद: पंजाबने रविवारी मुंबईला रोमांचक सामन्यात नमवून दिमाखात अंतिम फेरी गाठली आणि यासह यंदा आयपीएलमध्ये नवीन विजेता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. बंगलुरूने आधीच अंतिम फेरी गाठली असून, या दोन्ही संघांना अद्याप एकदाही आयपीएल चपक उंचावता आलेला नाही. त्यामुळे मंगळवारी जेव्हा हे दोन्ही संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने-सामने येतील, तेव्हा तुल्यबळ लढत होईलच, पण दडपण झझुगारून सर्वोत्तम खेळ करणारा संघच पहिल्यांदा हा झळाळता करंडक उंचावेल.
बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम लढत गाठली असून, त्यांना याआधी तीनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे, पंजाबने दुसऱ्यांदा अंतिम फेरी धडक मारली असून, त्यांनी एकदा उपविजेतेपद पटकाविले. या निर्णायक लढतीत सर्वांचे लक्ष अर्थातच विराट कोहलीकडे लागले असेल, जर्सी क्रमांक १८. आणि आयपीएलचे सत्रही १८ वे असल्याने चाहते यंदाचे सत्र कोहलीच जिंकेल, असे भाकीत वर्तवीत आहेत. मात्र, ज्याप्रकारे पंजाबने रविवारी मुंबईला नमविले, ते पाहता बंगळुरुचे पुन्हा एकदा स्वप्न भंगेल, अशी शक्यताही काही चाहत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
बंगळुरूने पहिल्या प्ले ऑफ लढतीत पंजाबला सहज नभवून वेट अंतिम फेरी गाठली होती. याच कामगिरीतून प्रेरणा घेऊन ते मंगळवारीही खेळतील. आयपीएलमध्ये नेहमी यशस्वी ठरणाऱ्या कोहलीने यंदाही ६०० हून अधिक धावा काढत बंगळुरूला अंतिम फेरीत पोहोचविण्यात मोलाची भूमिका निभावली. युवा कर्णधार रजत पाटीदारने आपल्या नेतृत्व कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले. कोहलीच्या शानदार कामगिरीमुळे बंगळूरू संघाला प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही कोहलीची कामगिरी संघासाठी महत्त्वाची ठरेल. गोलंदाजीत बंगळुरू संघ संतुलित असून, त्यांची मदार वेगवान गोलंदाज जोश हेड़ालवूडवर आहे. त्याचा अनुभव बंगळुरूच्या गोलंदाजांसाठी मोलाचा ठरत आहे. दुसरीकडे, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर फलंदाजीची मुख्य भिस्त आहे. माकी यान्सेनच्या अनुपस्थितीत पंजाबची गोलंदाजी काहीशी कमओर भासत आहे.
पाऊस येणार?
रविवारी पंजाब-मुंबई यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना पावसामुळे सुमारे सव्वादोन तास उशिराने सुरू झाला होता. त्यामुळे मंगळवारीही अंतिम सामन्यात पावसाची चिंता आहे. अहमदाबादमध्ये शुक्रवारपासून दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा असून, संध्याकाळी मात्र ढगाळ वातावरण होत आहे. रविवारीही नाणेफेक झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. हवामान खात्याने मंगळवारी १५ टक्के पावसाची शक्यता वर्तविली असल्याने अंतिम सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
सेनाप्रमुख येणार नाहीत
बीसीसीआयने आयपीएलव्या अंतिम सामन्यासाठी भारतीय सेनादल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अडमिरल दिनेश त्रिपाठी आणि वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना निमंत्रित केले होते. यावेळी भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष करण्यासाठी बीसीसीआयने विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, याद्वारे भारतीय सेनेला मानवंदना देण्यात येणार आहे. मात्र, गुरुवारी सरकारकडून मिळालेल्या निर्देशानंतर या कार्यक्रमांमध्ये बदल झाला असून, भारतीय सेनादलाचे तिन्ही प्रमुख या समारोप सोहळ्यात सहभागी होणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.