Tavis Head RCB vs Uber India, IPL 2025: सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरु आहे. मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी सुरु आहे. तसेच काही वेळा मैदानावर खेळाडूंमध्ये भांडणे किंवा 'तू तू मैं मैं' देखील होताना दिसते. असे असताना एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. RCB आणि Uber यांच्यात एका गोष्टीवरून खूप मोठा राडा झाला आहे. एका जाहिरातीवरून हा वाद सुरु झाला आहे. विशेष म्हणजे, SRH साठी आयपीएल खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रेव्हिस हेड या जाहिरातीचा भाग आहे. RCBच्या मते, या जाहिरातत 'रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू' असे म्हणत संघाची आणि शहराची खिल्ली उडवण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या जाहिरातीचे परिणाम उबर इंडियाला भोगावे लागणार असून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नेमका आक्षेप काय?
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या प्रकरणात खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की जाहिरातीत वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिमा मलिन झाली आहे. आरसीबीने म्हटले आहे की असे करून त्यांनी थेट त्यांच्या ट्रेडमार्कवर हल्ला केला आहे. जाहिरातीत करण्यात आलेला हा खोडसाळपणा केवळ संघाला हिणवण्याच्या उद्देशाने केला गेला असावा, असाही दावा करण्यात आला आहे.
घोषवाक्याचीही उडवली खिल्ला- RCB
आरसीबीच्या मते, त्यांच्या केवळ नावातच छेडछाड झाली नाही तर घोषवाक्याचीही खिल्ली उडवण्यात आली आहे. फ्रँचायझीने न्यायालयाला सांगितले की जाहिरातीत त्यांच्या आवडत्या घोषवाक्याची म्हणजेच 'ई साला कप नामदे"चीही खिल्ली उडवण्यात आली आहे. आरसीबीच्या मते, ते घोषवाक्य संघ आणि चाहत्यांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहे. अशा परिस्थितीत, जाहिरातीत ते व्यंग्यात्मक पद्धतीने सादर करणे म्हणजे चाहते आणि संघ दोघांच्याही भावनांची थट्टा करण्यासारखे आहे.
Uber India काय स्पष्टीकरण देणार?
जाहिरातीवर आरसीबीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता सर्वांच्या नजरा उबर इंडियाकडे आहेत. या जाहीरातीतून त्यांची भूमिका काय आहे हे पाहणे बाकी आहे. उबर ती जाहिरात मागे घेईल का किंवा आपल्या बचावात काही युक्तिवाद सादर करेल का? यावर साऱ्यांचे लक्ष आहे. प्रत्येक सामन्यासोबत आयपीएलचा उत्साह वाढत असताना हे विचित्र प्रकरण समोर आल्याने, क्रिकेटवर्तुळातील वातावरण तापले आहे.
कोर्टात काय घडू शकते?
RCB ने कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा युक्तिवाद सादर करावा लागेल. जर RCB ची बाजू भक्कम असे आणि न्यायालय त्यांच्याशी सहमत असेल तर उबर इंडियाला जाहिरात तर मागे घ्यावीच लागेल, सोबत RCBच्या चाहत्यांसाठी माफीनामाही जारी करावा लागेल.