New Captain of RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल २०२५ च्या नव्या हंगामासाठी आपल्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. गत हंगामात फाफ ड्युप्लेसी आरसीबी संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. तो ताफ्यातून 'आउट' झाल्यावर या संघाची धूरा कुणाच्या खांद्यावर पडणार असा प्रश्न चांगलाच चर्चित होता. आरसीबीच्या संघानं अखेर याचं उत्तर दिले आहे. रजत पाटीदार याला RCB संघाचा नवा कॅप्टन करण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रजतचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड एकदम भारी, आता खरं चॅलेंज, कारण...
देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये रजत पाटीदार याने १६ सामन्यात कॅप्टन्सी केली असून ७५ विनिंग पर्सेंटसह त्याने १२ मॅचेस जिंकल्या आहेत. बॅटिंगमधील खास कामगिरीसह तो आता आयपीएलमध्ये कॅप्टन्सीची अतिरिक्त जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. २००८ च्या हंगामापासून आरसीबीचा संघ आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसते. पण अद्याप त्यांना एकदाही जेतेपद पटकवता आलेले नाही. आता ३१ वर्षी रजतच्या कॅप्टन्सीत आरसीबीला सोनेरी दिवस येणार का? ते पाहण्याजोगे असेल.
फाफनंतर कोण? या प्रश्नानंतर विराट पुन्हा येईल अशी रंगली होती चर्चा, पण...
दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्युप्लेसी याने २०२२ ते २०२४ या कालावधीत आरसीबी संघाचे नेतृत्व केले होते. मेगा लिलावाआधी रंगलेल्या रिटेन रिलीजच्या खेळात आरसीबीने त्याला नारळ दिला होता. त्यानंतर फाफ मेगा लिलावात उतरला, पण आरसीबीने त्याच्यात रस दाखवला नाही. तो दिल्लीचा झाला अन् २०२५ च्या हंगामात आरसीबी नव्या कॅप्टनसह मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले. पुन्हा विराट कोहली या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करताना दिसेल, अशी चर्चा रंगली होती. पण ती फोल ठरली. विराट कोहली स्वत: कॅप्टन्सीसाठी तयार नाही. त्यामुळे अखेर दिर्घकालीन विचार करुन आरसीबीनं ३१ वर्षीय रजत पाटीदारवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.