पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आज आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पंजाबचा अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात चहलने आणखी तीन विकेट्स मिळवल्यास तो भारतात टी२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.
चहलने आतापर्यंत भारतात एकूण २५४ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २३.९४ च्या सरासरीने एकूण २८७ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पियुष चावलाने २८९ विकेट्स घेतल्या आहेत. पियुष चावलाचा विक्रम मोडण्यासाठी आणि या यादीत पहिले स्थान मिळवण्यासाठी तो फक्त तीन विकेट्स दूर आहे.
आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल २०१४ च्या हंगामापासून २०२१ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. त्यानंतर चहल पुढील तीन हंगामांसाठी राजस्थान रॉयल्सकडून खेळला. सध्या तो पंजाबकडून खेळत आहे. आरसीबी विरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात चहलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आरसीबी विरुद्ध चहलचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने १० सामन्यात २५.५४ च्या सरासरीने एकूण ११ विकेट्स घेतले आहेत. आयपीएल २०२५ मध्ये चहलच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १२ सामन्यात २५.२९ च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या आहेत.