पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील मैदानात खेळवण्यात येत आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर एक तास उशीरा सुरु झालेला सामना तांत्रिक अडचणीमुळे थांबवण्यात आला. पंजाबच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १०. १ षटकात १२२ धावा केल्या होत्या. सामना सुरु असताना मैदानातील लाइट्स हळू हळू बंद झाल्या. फ्लड लाइटमधील तांत्रिक बिघाडामुळे सामना थांबवण्यात आल्याची माहिती पहिल्यांदा देण्यात आली. पण त्यानंतर सामना सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. तांत्रिक कारणामुळे याआधी अशा प्रकारे कधीच सामना रद्द झाल्याचे पाहायला मिळालेले नाही. नेमकं कारण काय ते स्पष्ट करण्यात आले नसले तरी हा सामना थांबवण्यामागे भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीतीमुळे थांबवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. काही वेळातच त्याची पुष्टीही झाली.
पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला धर्मशाला येथे आयपीएल सामना सुरु असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून भारताच्या काही भागात हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याने पाकचा डाव हाणून पाडला. एवढेच नाही तर प्रत्युतरा दाखल भारतीय हवाई दलाचा ताफा पाकमध्ये घुसल्यााच्या बातम्याही समोर आल्या आहेत. धर्मशाला येथून दोन्ही संघातील खेळाडूंना सुरक्षित दिल्लीला नेण्यासाठी बीसीसीआयने खास व्यवस्था केल्याची माहितीही समोर आली आहे. भारत-पाक यांच्यातील युद्धजन्य परिस्थिमुळे या मॅचनंतर आता संपूर्ण स्पर्धेवर संकटाचे ढग निर्माण झाल्याचे दिसत आहे.
पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रियांश आर्यच्या रुपात एकमेव विकेट गमावली होती. त्याने ३४ चेंडूत ६ षटकाराच्या मदतीने ७० धावांची खेळी केली. त्याने २०५.८८ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या. दुसऱ्या बाजूला प्रभसिमरन याने २८ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सकडून टी नटराजन याने एकमात्र विकेट घेतली.