गत चॅम्पिय कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात शनिवारी, २२ मार्च रोजी रंगणाऱ्या लढतीनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात हा सामना नियोजित आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा दोन्ही संघांतील लढतीनं आयपीएलच्या हंगामाची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळेलॉ. याआधी २००८ च्या पहिल्या हंगामात या दोन्ही संघांतील लढतीनं स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. फरक फक्त एवढाच की, त्यावेळी बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. यात केकेआरनं बाजी मारली होती. आता कोलकाता आपल्या घरच्या मैदानात बंगळुरुचा संघ त्या सलामीच्या लढतीतील पराभवाचा बदला घेत यंदाच्या हंगाम विजयी सलामी देणार का? ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात दोन्ही संघातील आतापर्यंतच्या रेकॉर्ड्सवर
विराट, धोनी अन् रोहितसह हे ९ खेळाडू पहिल्या हंगामापासून गाजवताहेत IPL चं मैदान.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात दोन्ही संघात कोण कुणावर पडलंय भारी?
आयपीएलच्या आतापर्यंतच्या १७ हंगामात केकेआर आणि आरसीबी हे दोन संघ ३४ वेळा आमनेसामने आले आहेत.यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं २० वेळा बाजी मारलीये. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने फक्त १४ सामनेच जिंकले आहेत.
KKR विरुद्ध RCB यांच्यातील सर्वोच्च अन् निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड
आयपीएलच्या गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं ईडन गार्डन्सच्या मैदानात ६ बाद २२२ धावसंख्या उभारली होती. ही दोन्ही संघातील लढतीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. या धावसंख्याचे पाठलाग करातना आरबीसीतचा संघ २२० धावांपर्यंत पोहचला होता. ही RCB च्या संघानं KKR विरुद्ध केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. दोन्ही संघातील निच्चांकी धावसंख्याचा रेकॉर्ड हा आरसीबीच्या नावे आहे. २०१७ च्या हंगामात केकेआरनं आपल्या घरच्या मैदानात आरसीबीला ४९ धावांत ऑल आउट केले होते. २०२० च्या हंगामात अबू धाबीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघाला ८ बाद ८४ धावांत रोखले होते.
कसा आहे ईडन गार्डन्सच्या मैदानातील दोन्ही संघांचा रेकॉर्ड?
ईडन गार्डन्सच्या मैदानात केकेआरच्या संघानं ८८ पैकी ५२ सामन्यांत विजय नोंदवला आहे. गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं घरच्या मैदानात ७ पैकी ५ सामने जिंकले होते. २००८ ते २०२४ या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं इंत १३ सामने खेळले आहेत. यात त्यांना फक्त ५ सामन्यात विजय मिळवता आला आहे. उर्वरित ८ सामन्यात आरसीबीच्या संघाच्या पदरी पराभव आला आहे.
धावांचा पाठलाग करणं ठरतं फायद्याचं?
ईडन गार्डन्सच्या मैदानात आतापर्यंत ९३ आयपीएल सामने झाले आहेत. यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ५५ वेळा विजय मिळवला आहे. तर ३८ वेळा पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ जिंकला आहे.