जगातील सर्वात लोकप्रिय लीग पैकी एक असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने बाजी मारली. आरसीबी संघ १८ वर्षांत प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबीच्या संघाचा भाग असलेला विराट कोहली या विजयानंतर भावूक झाला. त्यावेळी विराट कोहलीने एक वक्तव्य केले, जे वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेलला पटले नाही. विराट कोहलीच्या वक्तव्यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली.
आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, "हा क्षण माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे. परंतु, तो अजूनही कसोटी क्रिकेटपेक्षा ५ स्तर खाली आहे. मी कसोटी क्रिकेटला खूप महत्त्व देतो. मला हा फॉरमॅट खूप आवडतो. म्हणूनच मी येणाऱ्या तरुणांना कसोटी क्रिकेटला पूर्ण आदर देण्याचे आवाहन करेन."
द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत आंद्रे रसेलने विराट कोहलीच्या वक्तव्यावर भाष्य केले. "भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या मोठ्या देशांकडून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची खूप काळजी घेतली जाते. परंतु, वेस्ट इंडीजच्या खेळाडूबाबत तसे होत नाही. मोठ्या देशांतील खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आपपल्या बोर्डाकडून चांगला केंद्रीय करार मिळतो. पण वेस्ट इंडिजमध्ये तुम्ही ५० किंवा १०० कसोटी खेळू शकता आणि निवृत्तीनंतर खेळाडूकडे फारसे काही नसते. माझा कसोटी क्रिकेटवर विश्वास आहे. पण शेवटी मी एक खेळाडू आहे."