Join us  

'सामनावीर' विराट RCBच्या विजयानंतर राहुल द्रविडबद्दल बोलला, म्हणाला- "ड्रेसिंग रुममध्ये..."

Virat Kohli Rahul Dravid: ७७ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यानंतर त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममध्ये काय करत असतो, याबद्दल भाष्य केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 9:45 AM

Open in App

Virat Kohli Rahul Dravid Team India, IPL 2024 RCB vs PBKS: विराट कोहलीच्या जबरदस्त अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अटीतटीच्या लढतीत पंजाब किंग्जवर विजय मिळवला. शिखर धवनच्या ४५ धावांच्या खेळीमुळे पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने ४९ चेंडूत दमदार ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे चार चेंडू आणि चार गडी राखून बंगळुरूने पंजाबवर विजय मिळवला. आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी विराट कोहलीला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यावेळी त्याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले.

राहुल द्रविडबद्दल काय म्हणाला कोहली?

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, जेव्हा तुम्ही खेळत असता त्यावेळी फॅन्स केवळ तुमचे स्कोअर, त्यामागचे आकडे, तुम्ही केलेले रेकॉर्ड याबद्दलच बोलत असतात. पण भविष्यात जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता त्यावेळी तुम्हाला आकडे आठवत नाही. मागे राहतात त्या खास आठवणी. यावर मला राहुल द्रविडचे उदाहरण आठवते. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडने मला असेच काहीसे सांगितले होते. तो म्हणतो की, तुम्ही जेव्हा मैदानावर खेळाल तेव्हा तुम्ही मनापासून खेळायला हवे, कारण पुढे जेव्हा तुम्ही तुमची कारकीर्द आठवता तेव्हा तुम्ही तुमचे मैदानात खेळणे मिस करता. त्यामुळे जेव्हा संधी मिळते तेव्हा मन लावून क्रिकेट खेळा. मला माझ्या टीम कडून आणि फॅन्सकडून जो सपोर्ट मिळाला तो कमाल होता. तसाच काहीसा पाठिंबा तुलाही मिळतोय ही चांगली बाब आहे"

दरम्यान, बरेच दिवस क्रिकेटपासून लांब असलेले दोन दिग्गज या सामन्यात चमकले. पंजाबची प्रथम फलंदाजी सुरु असताना शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. जितेश शर्मा (२७) आणि प्रभसिमरन सिंग (२५) यांनीही चांगली झुंज दिली. त्यामुळे RCBला १७७ धावांचे आव्हान मिळाले. बंगळुरूकडून विराट कोहलीने सलामीला येत डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याने तुफान फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला दिशा दिली. तर शेवटच्या टप्प्यात दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका चोख बजावली. १० चेंडूत नाबाद २८ धावा करत त्याने RCB महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीराहुल द्रविडरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर