IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : लखनौ सुपर जायंट्स ( LSG) व गुजरात टायटन्स ( GT) या दोन संघांबाबत 'नवे आहेत, पण छावे आहेत' असेच म्हणावे लागेल. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेले दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर आहेत. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स यांची मक्तेदारी मोडून या दोन्ही संघांनी गरूड झेप घेतली आहे. आता या दोघांमधल्या आजच्या लढतीतून आयपीएल २०२२मधील प्ले ऑफमध्ये पात्र ठरणारा पहिला दावेदार मिळणार आहे. दोन्ही संघांच्या खात्यात ११ सामन्यांनंतर प्रत्येकी १६ गुण आहेत आणि आज विजय मिळवणारा संघ प्ले ऑफमधील जागा निश्चित करणार आहे. पण, आज कोण जिंकतं यावर अन्य संघाचे गणित अवलंबून आहे. ( IPL 2022 playoffs scenarios )
पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी मोठ्या थाटात उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( MI ) यंदा घडी मात्र चांगली बसली नाही. हार्दिक व कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट यांना पर्याय शोधण्यात MI अपयशी ठरले आणि त्याचा फटका संघाला बसला. कर्णधार रोहित शर्मा व १५ कोटींचा इशान किशन यांचा फॉर्म हाही या अपयशास कारणीभूत आहे.
आयपीएल २०२२मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यात काल त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सना पराभूत केले असते तर KKRचेही पॅकअप झाले असते. आयपीएलमधील दुसरी यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) यांचेही आव्हान संपल्यात जमा आहे. आता जर तरच्या समीकरणावर त्यांचे गणित आहे. अशात प्ले ऑफच्या शर्यतीत गुजरात व लखनौ यांच्यासोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स हे सध्या आघाडीवर आहेत.
दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांना समान संधी आहे, पण तेही काठावरून माघारी परततील अशी शक्यता आहे. या तीनही संघानी ११ सामन्यांत ५ विजय मिळवले आहेत. पण, दिल्लीचा नेट रन रेट हा या दोघांपेक्षा वरचढ आहे. राजस्थान व बंगळुरू प्रत्येकी १४ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. अशात आज जर लखनौ जिंकला, तर RCBचे अव्वल दोन क्रमांकावरील संधी वाढेल. RCBच्या पुढील लढती पंजाब किंग्स व
गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे RCB या दोन्ही लढती जिंकून १८ गुणांसह टॉप टूमध्ये स्थान पक्के करू शकते. मात्र, आज जर गुजरात जिंकला तर राजस्थानला टॉप टूमध्ये जाण्याची जास्त संधी असेल, कारण राजस्थानचे तीन सामने बाकी आहेत. त्यांना दिल्ली, लखनौ व चेन्नईचा सामना करायचा आहे आणि या तीनही लढती जिंकून ते २० गुणांसह अव्वल स्थानीही बसू शकतात.