Join us

IPL 2021 : कोरोना काळात कमावलेत तेवढे किंवा १००० कोटी वैद्यकिय मदतीसाठी द्या; वकिलाची बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका

देशातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे बीसीसीआयनं अखेर इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:41 IST

Open in App

देशातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे बीसीसीआयनं अखेर इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. पण, इथेच बीसीसीआयचं संकट संपत नाही. बीसीसीआयनं कोरोना संकटातही आयपीएल खेळवून कमावलेल्या पैसी किंवा १००० कोटी वैद्यकिय मदतीसाठी आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी दंड म्हणून द्यावेत, अशी याचिका एका वकीलानं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. वकील वंदना शाह यांनी ही याचिका दाखल केली आहे. बीसीसीआयनं सर्व देशवासियांची माफी मागायला हवी, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. 

ही याचिका दाखल केली गेली, तेव्हा त्यात आयपीएल रोखण्याची मागणी केली गेली होती. पण, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलनं तातडीची बैठक बोलवून आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक वृद्धीमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला.  IPL 2021 स्थगित झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटला बसणार दुसरा मोठा धक्का, पाकिस्तानी मीडियाचा दावा! या संवेदनशील काळात आयपीएलचे आयोजन केल्याबद्दल बीसीसीआयला दोषी धरले पाहिजे. आयपीएल ही काय अत्यावश्यक सेवा आहे का?, असा सवालही करण्यात आला आहे. 

बीसीसीआयनं आज काय म्हटलं?बीसीसीआयनं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात हा निर्णय गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत BCCIच्या प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत एकमतानं घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ''खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि या स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्तिच्या सुरक्षिततेबाबत बीसीसीआय कोणतीच तडजोड करणार नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि भागीदारांचा विचार लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला आहे,''असे त्यात म्हटले आहे. 

''या कठीण प्रसंगी, विशेषतः भारतात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करण्याचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण, आता ही स्पर्धा स्थगित करणे अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबीयांकडे व प्रियजनांकडे जाऊ शकतात. बीसीसीआय या सर्वांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी संपूर्ण ताकदीनं प्रयत्न करेल.'' 

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआय