Join us  

‘दैवी गुणवत्ता वाया घालवू नकोस’ गावसकर यांचा सॅमसनला सल्ला

कामगिरीत सातत्या राखण्यात अपयशी ठरत असलेल्या या गुणवान क्रिकेटपटूला सुनील गावसकर यांनी एक सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 1:04 PM

Open in App

दुबई : गुणवत्ता असूनही कामगिरीत सातत्य राखण्यात संजू सॅमसन कमी पडताना दिसतो आहे. या आयपीएलमध्ये सॅमसन त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतो आहे. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात संजू सॅमसनने शतक ठोकले होते. मात्र, त्यानंतरच्या सामन्यात त्याची कामगिरी ढेपाळली. कामगिरीत सातत्या राखण्यात अपयशी ठरत असलेल्या या गुणवान क्रिकेटपटूला सुनील गावसकर यांनी एक सल्ला दिला आहे. गावसकरांच्या मते, संजू सॅमसनला आता चांगली कामगिरी सतत करत राहणे गरजेचे झाले आहे. तेव्हाच त्याच्या करिअरचा आलेख चढता असेल. तसेच सॅमसन याने त्याच्या फटक्यांच्या निवडीवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे गावसकर म्हणाले.

२०१५ ला भारतीय संघात पदार्पण करूनही सॅमसन फक्त एक एकदिवसीय सामना आणि दहा टी-२० सामने खेळला आहे. कामगिरीतल्या सातत्याच्या अभावामुळेच तो एवढे कमी सामने खेळू शकला. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली असते. गावसकर यांच्या मते, त्याने आक्रमक खेळाला संयमाची जोड देणे आवश्यक आहे. तेव्हाच त्याला यशस्वी होता येईल.

“फटक्यांच्या चुकीच्या निवडीमुळे सॅमसनची कामगिरी खालावत चालली आहे. असे पण नाही की तो आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीला उतरतो. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मात्र, फलंदाजीला आल्यावर पहिल्या चेंडूपासूनच मोठा फटका मारण्याचा त्याचा पवित्रा असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच काय, कुठल्याच क्रिकेटमध्ये हे शक्य नसते. तुम्ही कितीही फॉर्ममध्ये असलात तरीही. सुरुवात ही सांभाळूनच करावी लागते. सुरुवातीला संयम हा अतिशय गरजेचा असतो.”      - सुनील गावसकर 

टॅग्स :आयपीएल २०२१सुनील गावसकरसंजू सॅमसनक्रिकेट सट्टेबाजी
Open in App