नवी दिल्ली : बीसीसीआयच्या शनिवारी झालेल्या ऑनलाईन विशेष बैठकीत सदस्यांनी आयपीएलचे ३१ सामने यूएईत आयोजित करण्यास एकमताने सहमती दर्शविली. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये विंडो शोधून अबुधाबी, शारजा आणि दुबई येथील तीन मैदानांवर सामने होतील, अशी माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह यांनी दिली. १८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोजन होण्याची शक्यता आहे.
टी-२० विश्वचषकाबाबत येत्या १ जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक होणार आहे. यासाठी अध्यक्ष सौरव गांगुली, जय शाह आणि राजीव शुक्ला हे दुबईला जाणार आहेत. बीसीसीआय टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यास उत्सुक आहे. भारतातील कोरोनास्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ मिळावा, अशी विनंती बीसीसीआयकडून बैठकीत करण्यात येणार आहे. विशेष सभा ५० मिनिटे चालली. त्यात दोन्ही विषय सर्वसंमतीने मंजूर झाले.
विशेष सभेतील ठळक निर्णय
आयपीएलसाठी २५ दिवसांची विंडो शोधण्यात आली. ३१ सामने यूएईत तीन मैदानांवर होतील.
विदेशी खेळाडूबाबत बीसीसीआय त्यांच्या बोर्डसोबत चर्चा करेल. काही विदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आयपीएल खेळविले जाईल.
टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारतात करण्याआधी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आयसीसीकडे एक महिन्याचा वेळ मागण्यात येईल. चार महिने शिल्लक असल्याने कोरोनास्थिती सुधारण्याची बोर्डाला आशा आहे.
स्थानिक खेळाडूंना मानधन देण्याबाबत चर्चा झाली नाही. कोरोनामुळे रणजी करंडक रद्द झाल्याने ७०० खेळाडूंना फटका बसला.बोर्डने खेळाडूंना अनुदान देण्याची घोषणा जानेवारीत केली होती.
खेळाडूंच्या मॅचफिक्सिंगचा मुद्दा एका राज्य संघटनेने उपस्थित केला. सौरव गांगुली आणि राजीव शुक्ला यांनी अजेंड्यात समावेश नसल्याचे कारण देत हा मुद्दा फेटाळला.
विश्वचषक यजमानपदासाठी करसवलत मिळावी, यावर चर्चा झाली. यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून सरकार करसवलत देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
७ देशातील ६२ विदेशी खेळाडू
आयपीएलमध्ये सात देशातील ६२ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. सीएसके, केकेआर, मुंबई, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघात प्रत्येकी आठ खेळाडूंचा तसेच आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स संघात प्रत्येकी सात खेळाडूंचा भरणा आहे.
आतापर्यंतच्या २९ सामन्यांपैकी दिल्ली तसेच पंजाब संघांनी ८-८ तर अन्य सर्व संघांनी ७-७ सामने खेळले.
दिल्ली संघ सहा सामने जिंकून गुणतालिकेत आघाडीवर आहे.