इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे. DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. MIनं यापूर्वी पाचपैकी चार वेळा ( २०१० वगळता) आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मुंबईची ही घोडदौड दिल्ली रोखेल का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पण, आजचा हा सामना शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नावावर वेगळाच विक्रम नोंदवणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या यशात गब्बरचा मोठा वाटा आहे. आजच्या सामन्यात त्यानं ६७+ धावा केल्यास यंदाची ऑरेंज कॅप तो नावावर करेल. यंदाच्या आयपीएलमध्ये धवननं आतापर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम केला. आतापर्यंत एकाही फलंदाजाला सलग दोन सामन्यांत शतक झळकावता आले नव्हते, परंतु तो विक्रम धवननं यंदा नोंदवला. त्यानंतर धवनची बॅट थंडच पडली होती. त्याला ०, ०, ६ अशा धावा करता आल्या. नंतर पुन्हा त्यानं ५४, ०, ७८ अशा धावा केल्या आहेत. पण, आज तो एक वेगळाच विक्रम नावावर करणार आहे.
शिखर धवन आज चौथ्यांदा आयपीएल अंतिम सामना खेळणार आहे. तीन वेगवेगळ्या संघाकडून आयपीएल फायनल खेळणारा तिसरा खेळाडू आहे. धवननं यापूर्वी मुंबई इंडियन्स ( २०१०), सनरायझर्स हैदराबाद ( २०१६ व २०१८) यांच्याकडून आयपीएल फायनल खेळली होती. त्याच्याआधी शेन वॉटसन ( राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स) व युसूफ पठाण ( राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद) यांनी हा विक्रम केला आहे.