मुंबई - महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात खेळणाºया चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Superkings) सलग दोन पराभव पत्करावे लागले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सांघिक खेळ करण्यात अपयश आल्याने त्यांना यंदाच्या Indian Premier League (IPL 2020)
मध्ये सलग दुसरा सामना गमवावा लागला. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आक्रमक अर्धशतक झळकावून दिल्लीला विजयी करताना चेन्नईच्या गोलंदाजीवर तुफान हल्ला चढवला होता. सामन्यानंतर त्यानेच सांगितले की, चेन्नईकडून नेमकी कोणती चूक झाली.
कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सला नमवून दिमाखात सुरुवात केलेल्या चेन्नईकडून सर्वांनाच दमदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र सलग दोन सामन्यात झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांच्या गाडी विजयी मार्गावरुन घसरली. दिल्लीविरुद्ध तर त्यांच्या मर्यादाच स्पष्ट झाल्या. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना पृथ्वीने आपल्या योजनांबद्दल सांगितले की, ‘मैदानी फटके खेळण्याची माझी रणनीती होती. कोणताही अतिरिक्त धोका न पत्करताना चुका टाळण्यावर माझा भर होता.’
त्याचवेळी, पृथ्वीने चेन्नई संघाकडून कोणती आणि कशी चूक झाली हेदेखील सांगितले. चेन्नईकडे काही चांगले गोलंदाज आहेत, मात्र तरीही धावा काढण्यात पृथ्वीला यश मिळाले. चेन्नईकडून झालेल्या चुकांबाबत पृथ्वीने सांगितले की, ‘चेन्नई सुपरकिंग्जकडे काही शानदार गोलंदाज आहेत. मात्र यानंतरही मी गॅप्समध्ये फटके मारत धावा काढू शकलो. तसेच फिरकीपटू जेव्हा गोलंदाजीला आले, तेव्हा मला आणि शिखर धवनला कल्पना होती की, आम्ही पॉवरप्लेनंतर संघाच्या धावगतीला वेग देऊ शकतो.’