मुंबई, आयपीएल 2019 : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सचा संघ पुढे आला आहे. आपल्या पहिल्या सामन्यातून मिळणारी सर्व रक्कम चेन्नईचा संघ शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करणार आहे.
चेन्नईच्या संघाचे संचालक राकेश सिंह यांनी यावेळी सांगितले की, " चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु यांच्यामध्ये 23 मार्चला आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. चेपॉक हे आमचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे या सामन्यातून जी रक्कम आम्हाला मिळेल, ती सर्व रक्कम आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मानद लेफ्टनेंट कर्नल हे पद देण्यात आले आहेत. त्यामुळे धोनीच ही सारी रक्कम धनादेशाच्या स्वरुपात शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे. "
शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआय 20 कोटींची मदत करणारपुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे. शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठीच्या आर्मी वेल्फेअर फंडमध्ये 20 कोटी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 23 तारखेला होणाऱ्या पहिल्या सामन्यात बीसीसीआय भारतीय सैन्य दलाच्या तिनही तुकड्यांच्या प्रमुखांना निमंत्रित करणार आहेत.
आयपीएलचा उद्धाटनीय सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,''आर्मी वेल्फेअर फंडासाठी 20 कोटींचा निधी देण्यास सीओएने मंजुरी दिली आहे.'' तत्पूर्वी, आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा सोहळा रद्द करण्यात आला असला तरी या कार्यक्रमासाठी लागणारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय झाला. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यावेळी सांगितले की, " यावेळी आम्ही आयपीएलचा उद्घाटन सोहळा करणार नाही. या सोहळ्यासाठी आम्ही एक बजेट ठरवले होते. जी रक्कम आम्ही बजेटसाठी ठरवली होती, ती रक्कम आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहोत."