Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड दौरा: क्रिकेटपटूंवर कठोर निर्बंध; एकमेकांना भेटण्यासही केली मनाई

जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचा न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना १८ जूनपासून रंगेल. मात्र, या सामन्यासाठी सराव करण्याआधी भारतीय संघाला तीन दिवसांच्या कठोर विलगीकरणात राहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 07:02 IST

Open in App

साऊदम्प्टन : भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी इंग्लंडला पोहोचला असून, सध्या संपूर्ण संघ विलगीकरणात आहे. त्याचवेळी संघावर कडक निर्बंध लावण्यात आल्याची माहिती भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल याने दिली. भारतीय संघ तीन दिवस विलगीकरणात राहणार असून, यादरम्यान खेळाडूंना एकमेकांशी भेटता येणार नाही.जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचा न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना १८ जूनपासून रंगेल. मात्र, या सामन्यासाठी सराव करण्याआधी भारतीय संघाला तीन दिवसांच्या कठोर विलगीकरणात राहावे लागणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडला येण्याआधीही भारतीय संघ मुंबईत १४ दिवस विलगीकरणात राहिला होता.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाच्या चार्टर्ड विमानातील प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यामध्ये खेळाडूंशी संवाद साधण्यात आला आहे. यावेळी अक्षर पटेलने म्हटले की, ‘मी खूप चांगली झोप काढली आहे. आता आम्हाला विलगीकरणात राहायचे आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की, आम्ही तीन दिवस एकमेकांना भेटू शकणार नाही.’ भारताचे पुरुष व महिला संघ एकाच विमानाने लंडनला पोहोचले. येथून भारतीय संघ दोन तासांचा प्रवास करून साऊदम्पटन येथे पोहोचले.