भारतीय वायू सेनेचे देशावासियांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संकडूनही भारतीय सैन्याच्या बेधडक कारवाईला सॅल्युट ठोकण्यात येत आहे. मुल्तानचा सुलतान विरेंद्र सेहवागनेहीट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया देताना द बॉईज हॅव प्लेयड व्हेरी वेल असे सेहवागने म्हटले आहे. तसेच हॅशटॅग लिहिताना सुधर जाओ वरना सुधार देंगे असेही सेहवागने लिहिले आहे.
भारतीय वायू सेनेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. सेहवागपाठोपाठ भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यानेही भारतीय सैन्याचं कौतुक केलं आहे. तसेच दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिल्याचंही कांबळीने म्हटले. यापुढे भारतावर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांना दोनदा विचार करावा लागेल, असेही कांबळीने ट्विट करुन म्हटलंय. तसेच माजी फंलदाज हेमांग बदानीनेही ट्विट करुन हाऊ इज द जोश म्हणताना भारतीय सैन्याला सलाम केला आहे. सेहवागने त्याच्या स्टाईलने उत्तर देत पाकिस्तानच्या माजी कर्णधारांना टोला लगावला आहे. कारण, पाकिस्तानच्या संघाने क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर त्यांच्या कर्णधाराकडून वेल प्लेड बॉईज हाच डायलॉग आणि प्रतिक्रिया माध्यमांना देण्यात येत होती. सेहवागने त्याच भाषेत आपली प्रतिक्रिया देत पाकिस्तानला क्रिकेटच्या भाषेतच समजावलं आहे.
भारतीय सैन्याकडून मध्यरात्री 3.30 वाजता बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर दोन्ही उभय देशांमध्ये वेगवाग घडामोडी सुरू आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावून या हल्ल्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. तर, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही या हल्ल्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून का आणि कुठे हल्ला केला, याची माहिती गोखले यांनी दिली.
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या हल्ल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला असून भारतीय वायू सेनेकडून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हे हल्ले करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील संघटना जैश ए मोहमद हे भारतीय सैन्यावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच भारतीय सैन्याने हल्ला घडवून त्यांच कंबरड मोडलं आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी, कमांडर, ट्रेनी दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मात्र, या हल्ल्यात नागरिकांना कुठलाही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.