India vs West Indies, 52nd Match, Super 8 Group 1 : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद १९५ धावा करत टीम इंडियासमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत कधीही १७६ धावांपेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. त्यामुळे विक्रमी विजयासह टीम इंडिया सेमीच तिकीट मिळवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
अर्धशतकाशिवाय संपला वेस्ट इंडिजचा डाव, पण...
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर भारतीय गोलंदाजांपेक्षा क्षेत्रक्षकांनी अधिक निराश केले. रनआउटच्या संधीसह काही झेल सोडले. परिणामी छोट्या छोट्या भागीदारीसह वेस्ट इंडिजच्या संघाने मोठी धावसंख्या उभारण्याचा डाव साधला. वेस्ट इंडिजच्या संघाकडून एकानेही अर्धशतक झळकावले नाही. पण सलामीवीरांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीनंतर पॉवेल आणि होल्डरच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेजनं केल्या सर्वाधिक धावा, टीम इंडियाकडून बुमराह चमकला
पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार शई होप आणि रोस्टन चेज यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचली. क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांमुळे ही भागीदारी बहरली. होपनं ३३ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. वरुण चक्रवर्तीनं त्याच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. जसप्रीत बुमराहनं रोस्टन चेजला आणि शेमरॉन हेटमायर यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. चेजनं २५ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी ठरली. शेमरॉन हेटमायरनं १२ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. शेरफन रुदरफोर्ड याने ९ चेंडूत १४ धावा करून मैदान सोडल्यावर राव्हमन पॉवेल ३४ (१९) आणि जेसन होल्डर ३७ (२२) यांनी पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूत नाबाद ७६ धावांची भागीदारी रचत संघाच्या धावफलकावर १९५ धावा लावल्या.