टी-२० विश्वचषकाचा थरार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी दोन बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुपर-८ फेरीतील अंत्यत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजच्या संघात एकापेक्षा एक धोकादायक खेळाडू असून हा सामना भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
आयसीसी क्रमवारीत भारत पहिल्या तर वेस्ट इंडिज सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजचे पारडे जड राहिले आहे. टी-२० विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघ ४ वेळा भिडले आहेत, ज्यापैकी ३ वेळा विंडीजने बाजी मारली आहे. टी-२० विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघ ४ वेळा भिडले आहेत, ज्यापैकी ३ वेळा विंडीजने बाजी मारली आहे. भारताने १२ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये ढाका येथे विंडीजचा पराभव केला. त्यानंतर २०१६ च्या उपांत्य फेरीत विंडीजने मुंबईत भारताचा पराभव करून स्पर्धबाहेर काढले होते.
कॅरिबियन संघाकडे ७ व्या क्रमांकापर्यंत तडाखेबंद फलंदाज आहेत. इतकेच नाही तर ८ व्या क्रमांकावर येणाऱ्या रोमारियो शेफर्डनेही या स्पर्धेत अर्धशतक झळकावून आपली ताकद दाखवून दिली आहे. विंडीजच्या गोलंदाजीकडे वेग आणि फिरकीची उत्तम विविधता आहे. त्यांच्या फिरकीपटूने सर्वाधिक १० विकेट्स घेतले आहेत, तर जेसन होल्डर आणि शेफर्डने प्रत्येकी ८ विकेट्स घेत भारतीय फलंदाजांसमोर आव्हान उभे केले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच विंडीजने बलाढ्य इंग्लंडचा ३० धावांनी पराभव करून आपले इरादे स्पष्ट केले.
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना या स्पर्धेत आतापर्यंत केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, या दोनपैकी केवळ एकाच संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. जर भारताला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल, तर त्यांना विंडीजच्या तडाखेबंद फलंदाजीवर अंकुश लावावा लागेल. १२ वर्षांपूर्वीच्या विजयाची पुनरावृत्ती करत सूर्या ब्रिगेडला हा हाय-व्होल्टेज सामना जिंकावा लागेल.