ICC Womens World Cup 2025, India Women vs Sri Lanka Women, 1st Match IND W Beats SL W By 58 Runs : दीप्ती शर्मा, अमनजोत कौर आणि स्नेह राणा या तिघींच्या अष्टपैलू खेळीनंतर श्री चरणीच्या सुंदर गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ४७ षटकांच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात २६९ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियानुसार श्रीलंकेच्या संघाला २७१ धावांचे टार्गेट मिळाले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकात २११ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१२१ धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, पण...
पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या १४ धावा असताना स्मृती मानधना १० चेंडूत ८ धावांवर बाद झाली. त्यानंतर प्रतिका फसली. तिने ५९ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. हरलीन देओल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अडखळली. ६४ चेंडूत ४८ धावांवर तिच्या खेळीला ब्रेक लागला. तिच्या पाठोपाठ जेमिमानं आपली विकेट गमावली. तिच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. भारतीय संघाची कर्णधार हरमप्रीत कौरच्या रुपात टीम इंडियाल आणखी एक धक्का बसला. ती २१ धावा करून माघारी फिरली. अवघ्या १२१ धावांवर भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पण संघ अडचणीत असताना दीप्ती अन् अमनजोत कौर जोडी जमली. या दोघींनी संघाचा डाव सावरला.
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
दीप्ती-अमनजोत कौरची यांच्यात शतकी भागीदारी
ठराविक अंतराने विकेट पडत असताना दीप्ती आणि अमनजोत कौर जोडी जमली. दोघींनी सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली. या दोघींनी संघाला फक्त अडचणीतून बाहेर काढले नाही तर संघाची धावसंख्या २०० पार नेली. अमनजोत कौरनं ५६ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला दीप्तीनं ५६ चेंडूत ५७ धावा केल्या. अखेरच्या षटकात स्नेह राणानं १५ चेंडूत नाबाद २८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देत ४७ षटकात भारताच्या धावफलकाव ८ विकेट्सच्या मोबदल्यात २६९ धावा लावल्या.
गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येकीच्या खात्यात किमान एक विकेट
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकनं कर्णधार चामरी अट्टापटू हिने ४७ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय निलाक्षी डि सिल्व्हा हिने २९ चेंडूत केलेली ३५ धावांची खेळी वगळता अन्य कुणाला मैदानात तग धरता आला नाही. भारताकडून गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येकीनं किमान एक विकेट मिळवली. यात दीप्ती शर्मानं सर्वाधिक ३ तर श्री चरणी आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. क्रांती गौड, अमनजोत यांच्याशिवाय प्रतिका रावल हिनेही एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.