Join us  

India vs South Africa, 3rd Test : उमेश यादवचा बाऊन्सर आदळला आणि तो थेट जमिनीवरच पडला

दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाला गंभीर दुखापत झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 4:28 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा एक बाऊन्सर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर आदळला आणि त्यानंतर तो थेट जमिनीवर पडल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाला गंभीर दुखापत झाली असून त्याला आता या सामन्याला मुकावे लागणार आहे.

उमेश यादवच्या दहाव्या षटकात ही गोष्ट घडली. उमेशने एक बाऊन्सर टाकला. या बाऊन्सरचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला यशस्वीपणे करता आला नाही. हा चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला आणि तो थेट जमिनीवर पडला. एल्गर जमिनीवर पडल्यावर भारताचे खेळाडू त्याच्याजवळ धावत गेले. संघाचा फिजिओही मैदानात आला. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती की, त्यानंतर एल्गरला एकही चेंडू खेळता आला नाही.

एल्गरने तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 16 धावा केल्या होत्या. पण आता दुखापतीमुळे त्याला पुन्हा मैदानात येता येणार नाही. आता त्याच्याजागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी देण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली. 

सऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात आफ्रिकेचे दोन फलंदाज अवघ्या 9 धावांत माघारी परतले होते.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात उमेश यादवनं अप्रतीम चेंडू टाकून आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर झुबायर हम्झा आणि टेंबा बवुमा यांनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे वाटले होते. पण, रवींद्र जडेजानं अर्धशतक झळकावणाऱ्या हम्झाला बाद केले. हम्झानं 79 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचून 62 धावा केल्या. पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर प्रथमच टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या शाहबाज नदीमनं भारताला यश मिळवून दिले. त्यानं बवूमाला बाद करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट पटकावली. बवूमानं 72 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 32 धावा केल्या होत्या. कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या हेन्रीक क्लासेनला रवींद्र जडेजानं त्रिफळाचीत केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका