टी-२० वर्ल्ड कप २०२६ सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट जगतात मोठ्या घडामोडी घडत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक होत असून, या वादात आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी पाकिस्तान गाठल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांचा संघ विश्वचषकातील इतर सामने खेळण्यासाठी श्रीलंकेला जाईल, परंतु भारताच्या विरोधात होणाऱ्या साखळी फेरीतील सामन्यावर ते बहिष्कार टाकतील. ही भूमिका त्यांनी बांगलादेशच्या समर्थनार्थ आणि आयसीसीच्या धोरणांच्या विरोधात घेतल्याचे सांगितले जात आहे.
बांगलादेशची एन्ट्री कशासाठी?
बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला होता, ज्यानंतर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करत त्यांच्या जागी 'स्कॉटलंड'ला संधी दिली आहे. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अचानक पाकिस्तानला पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन आयसीसीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का, किंवा भारत-पाक सामन्याबाबत काही तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयसीसीचा इशारा आणि पाकिस्तानचे नुकसान
आयसीसीने स्पष्ट केले आहे की, जागतिक स्पर्धांमध्ये वेळापत्रकानुसार खेळणे सर्व संघांसाठी बंधनकारक आहे. जर पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते, तसेच गुणतालिकेतही त्यांचे मोठे नुकसान होईल.