टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा आणि थरारक सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानने भारताच्या फलंदाजांना रोखण्यासाठी आपला 'मिस्ट्री स्पिनर' उस्मान तारिक याला शस्त्र म्हणून वापरण्याची तयारी केली आहे. तारिक हा क्रीझमध्ये काही सेकंद थांबतो आणि मग अचानक बॉल टाकतो. या त्याच्या शैलीमुळे अनेकांना त्याचा सामना करणे कठीण जात आहे. अशातच भारतानेही तारिकच्या या शैलीचा तगडा पर्याय शोधून काढला असून या फलंदाजांना या सामन्यासाठी भारतीय गोलंदाजांकडून देखील थांबून बॉलिंग टाकण्याचा सराव करण्यात आला आहे.
कोण आहे उस्मान तारिक?
उस्मान तारिक हा आपल्या आगळ्यावेगळ्या गोलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. त्याची गोलंदाजीची ॲक्शन फलंदाजांना चकवा देणारी आहे. पाकिस्तान सुपर लीग मध्ये त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणले होते. आता भारताच्या ताकदवान फलंदाजीला, विशेषतः रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना लगाम घालण्यासाठी पाकिस्तान या गुढ फिरकीपटूचा 'नेट बॉलर' म्हणून वापर करत आहे.
पाकिस्तानी संघाने मिस्ट्री बॉलर आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१२-१३ मध्ये जेव्हा पाकिस्तानचा ७ फूट १ इंच उंचीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान पहिल्यांदा भारतात आला होता, तेव्हा त्याच्या उंचीमुळे चेंडूला मिळणारा उसळता टप्पा भारतीय फलंदाजांसाठी चिंतेचा विषय होता. सरावा दरम्यान भारतीय फलंदाजांना इतक्या उंचीवरून येणाऱ्या चेंडूचा सराव नव्हता. म्हणून, तत्कालीन सपोर्ट स्टाफने नेटमध्ये खुर्ची किंवा स्टूलवर उभे राहून थ्रो-डाऊन देण्यास सुरुवात केली. यामुळे फलंदाजांना खांद्याच्या वर येणाऱ्या चेंडूंना खेळण्याची सवय झाली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी या खास सरावाचा खूप फायदा झाल्याचे नंतर सांगितले होते. अगदी तसेच उत्तर भारताने या आताच्या पाकिस्तानी गोलंदाजाविरोधात शोधले आहे.
आता पाकिस्तान ज्या उस्मान तारिकला 'सरप्राईज पॅकेज' म्हणून वापरत आहे, त्याचे आव्हान उंचीचे नसून 'वेळेचे' आहे. कारण हा तारिक चेंडू टाकण्यासाठी धावत तर येतो परंतू काही सेकंद थांबून बॉल टाकतो. उस्मान तारिक हा चेंडू टाकण्यापूर्वी एक क्षण पूर्णपणे थांबतो. यामुळे फलंदाजाचे पाय आधीच हलतात किंवा त्याचा शॉट मारण्याचा टायमिंग चुकतो. भारतीय फलंदाज आता अशा गोलंदाजीचा सराव करत आहेत जो शेवटच्या क्षणी हाताची हालचाल बदलतो किंवा मुद्दाम थांबून नंतर टाकतो. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव सारख्या फलंदाजांना चेंडू रिलीज होईपर्यंत संयम राखण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या सरावात सुर्या देखील अशीच गोलंदाजी फलंदाजांना टाकत आहे.