मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने पहिल्या पाच षटकांत वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच षटकात किवींना धक्का दिला. त्यानं मार्टिन गुप्तीलला दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. पण, कोहलीच्या संघनिवडीवर माजी कर्णधार सौरव गांगुलीनं नाराजी प्रकट केली. कोहलीनं संघात एकमात्र बदल केला आणि तोही कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहलला खेळवण्याचा. उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात मोहम्मद शमीला बाकावर बसवल्यानं गांगुलीनं नाराजी प्रकट केली.
भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद शमीला खेळण्याची संधी मिळाली. शमीनं मिळालेल्या संधीचं सोनं करताना चार सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, भुवनेश्वर कुमारने तंदुरूस्त होत संघात पुन्हा स्थान पटकावलं. अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शमीला विश्रांती देत भुवीनं पुनरागमन केले होते. पण, आजच्या सामन्यात शमीला संधी देण्यात यावी अशी सर्वांची मागणी होती. पण, कोहलीनं भुवी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासहच मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला.
समालोचकाच्या कक्षात असलेल्या गांगुलीनं या निर्णयावर नाराजी प्रकट केली. त्याच्या मताशी सहमती दर्शवताना हर्षा भोगलेनेही ट्विट केलं. त्यानं लिहिलं की,'' गांगुलीप्रमाणे मीही शमीला न खेळवण्याच्या निर्णयावर नाराज आहे. त्याने विकेट्स घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाच्या उपस्थितीत आपल्याकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज होते. शिवाय कुलदीप यादवची किवीविरुद्ध कामगिरी चांगली होती, तरीही त्याला वगळण्याचा निर्णयाला धाडस म्हणावं का.''