Join us  

India vs New Zealand, 2nd Test : मालिकेतील अपयशानंतर विराट कोहली म्हणतो; सर्वोत्तम संघाकडून पराभूत झाल्याची खंत नाही, पण... 

India vs New Zealand, 2nd Test : जगातल्या अव्वल कसोटी संघाला असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं म्हणणं काही वेगळंच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 9:24 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कालच्या ६ बाद ९० धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. जगातल्या अव्वल कसोटी संघाला असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं म्हणणं काही वेगळंच आहे. सर्वोत्तम संघाकडून पराभूत झाल्याची खंत वाटत नसल्याचे मत त्यानं व्यक्त केलं. त्याचवेळी विराटनं टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.

तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांना खिंड लढवायची होती, परंतु तेही अपयशी ठरले. भारताच्या तळाच्या चार फलंदाजांना तिसऱ्या दिवशी केवळ ३४ धावा जोडता आल्या. भारताचा दुसरा डाव १२४ धावांत गडगडला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी केवळ १३२ धावांचे आव्हान ठेवण्यात टीम इंडियाला यश आले.  ट्रेंट बोल्टने चार आणि टीम साऊदीने ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी पहिल्या विकेटसाठी भक्कम भागीदारी करताना टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. लॅथमला 52 धावांवर उमेश यादवनं माघारी पाठवलं. त्यानंतर आलेला केन विलियम्सनही ( 5) लगेच बाद झाला. ब्लंडलने 55 धावांच्या खेळीत 8 चौकार व 1 षटकार खेचले. त्याला जसप्रीत बुमराहनं बाद केले. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला.  

या पराभवानंतर विराट म्हणाला,''फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात आम्ही अपयशी ठरलो. गोलंदाजांनी योग्य मारा करण्यात सातत्य राखले नाही. त्याउलट न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आमच्यावर प्रचंड दडपण निर्माण केले. आम्ही रणनीतीची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलो, तर न्यूझीलंड यशस्वी ठरले. आमच्या फलंदाजांकडून न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यातुलनेत गोलंदाजांची कामगिरी किंचितशी चांगली झाली.''

''या मालिकेतील अपयशानंतर झालेल्या चुकांवर अभ्यास केला जाईल. नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला, असं म्हणणं चुकीचे ठरेल. त्याबाबत आमची तक्रार नाही. पराभवानंतर कोणतेही कारण द्यायचे नाही. आता पुढे चालत राहायचे आहे. या मालिकेत आम्ही चांगला खेळ करण्यात अयपशी ठरलो,'' असे विराटने सांगितेल. 

ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंड, पाकिस्तानला मागे टाकून न्यूझीलंडची आगेकूच

न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड