माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी 325 धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्मा ( 87), शिखर धवन ( 66), विराट कोहली ( 43), अंबाती रायुडू ( 47), महेंद्रसिंग धोनी ( 48*) आणि केदार जाधव ( 22*) यांनी किवी गोलंदाजांची धुलाई केली. धोनीला सलग चौथ्या वन डे सामन्यात अर्धशतकी खेळी साकारण्यात अपयश आले, परंतु त्याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने टीकाकारांची बोलती बंद केली.
रोहित व शिखर यांच्या दीडशतकी भागीदारीनंतर मधल्या फळीतील खेळाडूंनी त्यांची भूमिका चोख बजावली. कर्णधार कोहली बाद झाला त्यावेळी भारताच्या 39.1 षटकांत 3 बाद 236 धावा होत्या. त्यानंतर धोनीनं सुरुवातीला रायुडू आणि नंतर जाधवसह भारताच्या धावासंख्येचा वेग कायम राखला. त्याने 33 चेंडूंत नाबाद 48 धावा केल्या आणि त्यात 5 चौकार व 1 षटकार यांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीने सलग तीन सामन्यांत अर्धशतकं झळकावली होती. धोनीचा खेळ संथ झाला अशी ओरड मारणाऱ्या टीकाकारांना धोनीने आपल्या कामगिरीनेच उत्तर दिले. 2019च्या वर्षाची धुमधडाक्यात सुरुवात करताना धोनीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. तेच सत्र धोनीने न्यूझीलंडमध्येही कायम राखले. आजच्या खेळीने त्याला कोहली व रोहित यांच्याही पुढे नेऊन ठेवले आहे.