वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या दमदार खेळीनंतरही भारतीय महिला संघाला बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला. मानधना व रॉड्रीग्ज ही जोडी माघारी परतल्यानंतर संघातील अन्य फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. अनुभवी मिताली राजला न खेळवण्याचा डाव पुन्हा एकदा फसला. तिच्या गैरहजेरीत भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कमकुवत दिसली आणि संघाला 23 धावांनी हार मानावी लागली.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडची सर्वात घातकी फलंदाज सूजी बेट्सला (7) लगेच माघारी पाठवून भारताने मोठे यश मिळवले, परंतु सोफी डेव्हिनने एका बाजूने जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली. तिने 48 चेंडूंत 62 धावा केल्या आणि त्यात 6 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. तिला अॅमी सॅटरवेट ( 33) आणि कॅटी मार्टिन ( 27*) यांनी योग्य साथ दिली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर किवींनी 20 षटकांत 4 बाद 159 धावा केल्या.
न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 160 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना प्रिया पुनिया ( 4) लगेच माघारी परतला. मात्र, स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज या महाराष्ट्राच्या कन्यांनी किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 2018 सालची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरलेल्या स्मृतीने या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. तिने अवघ्या 24 चेंडूंत 50 धावा करताना महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. स्मृती व जेमिमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. पण, स्मृती ( 58) व जेमिमा ( 39) मागोमाग तंबूत परतल्याने भारताच्या अडचणी वाढल्या.
दयालन हेमलता ( 7) व अनुजा पाटील (0) यांना झटपट माघारी पाठवून ली ताहूहूने भारताच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर भारतीय संघाला डोकं वर काढणे अवघड झाले. हरमनप्रीतही पराभव टाळू शकली नाही. ताहूहूने 20 धावांत 3 फलंदाज बाद केले. भारताचा संपूर्ण संघ 136 धावांवर तंबूत परतला.