वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचे दडपण फलंदाजांवर प्रकर्षाने जाणवले. जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघाला 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. न्यूझीलंडने पाहुण्या भारताला 139 धावांवर रोखले आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने हा सामना 80 धावांनी जिंकला. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सेइफर्टने 43 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 84 धावा केल्या. त्याला मुन्रो ( 34), कर्णधार केन विलियम्सन ( 34), रॉस टेलर ( 23) आणि स्कॉट कुगलेंजने ( 20*) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला.
220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना
शिखर धवन व विजय शंकर वगळता भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार
रोहित शर्मा (1), रिषभ पंत (4), दिनेश कार्तिक ( 5), हार्दिक पांड्या ( 4) यांनी निराश केले. इश सोधी व मिचेल सँटनर यांनी भारताच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले. महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर होता खरा, परंतु धावा आणि चेंडू यांच्यातील वाढलेले अंतर कमी करण्यात तो अपयशी ठरला. 39 धावांवर धोनी बाद झाला.