‘सतत स्वत:ला सिद्ध करत राहण्याला ना नाही, आजच्या काळात ते करावंच लागतं. मात्र वाईट याचं वाटतं की, आपण केलेल्या उत्तम कामगिरीकडेही कानाडोळा केला जातो आणि कुणाला कदर नाही आपली, असं जे आतून पोखरतं, त्या भावनेशी लढून, त्यावर मात करणं जास्त अवघड असतं!’
केएल राहुलने एका मुलाखतीत हे सांगितलं तेव्हाही लोक त्याला हसलेच होते. त्याच्यावर प्रचंड टीका झाली. तो किती बिनभरवशाचा आहे, किती थंड, बावळट आहे म्हणाले. हे कमीच म्हणून भारतीय संघव्यवस्थापनाने त्याला वाटेल त्या जागेवर खेळवलं.
कधी सलामीला पाठवलं, कधी मधल्या फळीत खेळवलं, गरज असेल तेव्हा यष्टिरक्षकही केलं. जिथे कमी तिथे मी या तत्त्वावर तो खेळत राहिला. ते कमीच म्हणून आयपीएलमध्ये लखनौचा कर्णधार असताना, त्या संघाचे मालक संजीव गोयंका यांनी त्याचा जाहीर अपमान केला.
या साऱ्यात राहुल शांतच होता. खेळतच होता; पण त्याची कामगिरी म्हणजेही वळीवच. कधी तुफान खेळ तर कधी काहीच नाही. ‘सातत्य’ ही अगदी अंडर १९ क्रिकेट विश्वचषकापासून त्याची कच्ची बाजू. त्यात दुखापतींनी कधी सातत्य सोडलं नाही.
तंत्रावर पकड पक्की असली तरी मोठा खेळाडू म्हणून आजतागायत त्याला कुणी मोजले नाही. त्यात एका आचरट टॉक शोमध्ये त्यानं केलेली वाह्यात बडबड त्याच्यावर कायमचा ‘इम्मॅच्युअर्ड’ असा ठप्पा लावून गेली.
मंगळुरूचा हा साधासा मुलगा; मात्र हरला किंवा दमला नाही. संधी मिळाली की तो कमबॅक करत राहिला. दहा वर्षांपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण केलं होतं आणि परवा लिड्सवर इतर खेळाडूंना सोबत घेऊन त्यानं शतक केलं तेव्हा कुठं जगाला दिसला एक मॅच्युअर्ड केएल राहुल.
नव्या अननुभवी संघात ‘भरवशाचा’ सीनिअर खेळाडू! कसोटी खेळताना तो चार भाषांत बोलत होता. साई सुदर्शनशी तमिळ, करुण नायरशी कानडी, ऋषभ पंतशी हिंदी आणि नंतर मुलाखती दिल्या इंग्रजीत.. शेवटी त्यानं सिद्ध केलंच स्वत:ला...!