पुण्याच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना खेळवण्यात येत आहे. पहिल्या तीन सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला होता. पण यावेळी इंग्लंडचा कॅप्टन जोस बटरलनं टॉस जिंकला अन् मालिकेतील बरोबरी साधण्यासाठी त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत पहिल्यांदाच टार्गेट सेट करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पुण्याचं मैदानात मारण्यासाठी भारतीय संघात तीन प्रमुख बदल करण्यात आले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शमी बाकावर; टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
तिसऱ्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय कमबॅक करताना मोहम्मद शमीला आपली जादू दाखवता आली नव्हती. त्याला चौथ्य सामन्यासाठी बाकावर बसवण्यात आले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या अर्शदीप सिंगची त्याच्या जागी एन्ट्री झाली आहे. याशिवाय दुखापतीतून सावरणाऱ्या रिंकू सिंगलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. या दोघांशिवाय शिवम दुबे पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.
चौथ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (विकेट कीपर/बॅटर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
फिलिप साल्ट (विकेट कीपर/बॅटर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रुक, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्यानं सेट करेल टार्गेट
भारतीय संघानं पहिल्या तीन सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याला पसंती दिली होती. यातील पहिल्या दोन सामन्यातील विजयासह टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली. पण तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने मालिकेत कमबॅक केले. पुण्याच्या मैदानातील सामना जिंकून पाहुणा इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे भारतीय संघ या सामन्यातील विजयासह मालिका खिशात घालण्यावर जोर देईल. यासाठी टीम इंडिया इंग्लंडसमोर किती टार्गेट सेट करणार ते पाहण्याजोगे असेल.